Raksha Bandhan 2021 : देवाला देवराखी बांधल्याने होतात अनेक लाभ; कोणते ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 05:39 PM2021-08-19T17:39:02+5:302021-08-19T17:43:38+5:30

Raksha Bandhan 2021 : रक्षाबंधनाच्या दिवशी आपण आपल्या भाऊरायाला जितक्या प्रेमाने राखी बांधतो, तेवढ्याच प्रेमाने देवालाही राखी बांधतो. 'तुम ही हो बंधू, सखा तुम्ही' अशी सलगी देवाशी असल्यामुळे ऋणानुबंध दृढ करण्याचा हा एक सोपस्कार आपण दरवर्षी आठवणीने पाळतो. त्यातही या पाच देवतांना त्यांच्या आवडत्या रंगाची राखी बांधल्याने त्यांच्याशी स्नेह जडतो आणि आपल्या कुटुंबाच्या सुखदुःखात भगवंत मोठ्या भावाप्रमाणे मदतीला येतो.

बाप्पा आपल्या सगळ्यांचाच लाडका. दैवत म्हणून त्याची पूजा आपण करतोच, पण कधी त्याच्याशी नातं जोडून पाहिलं आहे का? दर संकष्टीला बाप्पाच्या हातावर आठवणीने मोदकाचा नैवेद्य ठेवता, तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी त्याच्या मनगटावर लाल रंगाची राखी बांधून पहा. बाप्पा आपल्या पाठीशी आहे, हा आत्मविश्वास दुणावेल. बाप्पाचा वरदहस्त लाभला, तर घरातले वातावरण कायम मंगलमयी राहील.

लोक लक्ष्मीची पूजा करतात आणि तिला मिळवण्यासाठी अट्टाहास करतात. परंतु जे विष्णूंची उपासना करतात, त्यांना आपोआपच लक्ष्मीप्राप्ती होते. कारण जिथे विष्णू तिथे लक्ष्मी. या दोहोंचा आशीर्वाद मिळवायचा असेल, तर विष्णूंची उपासना सुरू करा. रक्षा बंधनाच्या दिवशी विष्णूंना पिवळ्या रंगाची राखी बांधा आणि जगद्पित्याशी बंधुत्व जोडण्याचा प्रयत्न करा.

महादेवाचे कुठेही देऊळ नसते. परंतु त्याची आत्मज्योती ज्यात विसावते, ते म्हणजे शिवलिंग. श्रावण मासात आपण महादेवाची पूजा करतोच, त्याचबरोबर त्यांना निळ्या रंगाची राखी बांधली असता त्या धाग्याची सकारात्मकता आपल्याला दिलासा देत राहील. वाईट गोष्टींचा नायनाट करणारे महादेव आपल्या पाठीशी उभे राहून 'माझ्या कडे देव माझा पाहतो आहे' हा दिलासा देत राहतील.

ज्यांना भाऊ नसतो अशा कितीतरी भगिनी कृष्णाला आपला भाऊ मानून राखी बांधतात. संतांनी देखील वर्णन केले आहे, 'कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारु' सर्वस्व कृष्ण मानणाऱ्या भक्तांना श्रीकृष्ण बंधू रूपातही भेटतो. त्याने ज्याप्रमाणे द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या प्रसंगी वस्त्र पुरवून तिचे लज्जारक्षण केले, तसा बाका प्रसंग आपल्याही आयुष्यात आला तर कृष्ण पाठीशी उभा राहावा म्हणून कृष्णाला हिरव्या रंगाची राखी बांधा.

हनुमंताच्या नुसत्या नावाने भूत पिशाच्च निकट येत नाहीत, असे हनुमान चालीसा मध्ये संत तुलसी दासांनी वर्णन केले आहे. असा कणखर भाऊ आपल्याला लाभला, तर कसलेही भय उरणार नाही. आयुष्यात उत्तरोत्तर प्रगती होत राहील. यासाठी श्रद्धेने हनुमंताला केशरी रंगाची राखी बांधायला विसरू नका.