'या' पाच राशींचे लोक असतात कायम गोंधळलेले; निर्णयक्षमता असते कमकुवत!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 05:05 PM2022-01-19T17:05:53+5:302022-01-19T17:10:26+5:30

माणसाच्या स्वभावावर त्याच्या राशीचा प्रभाव असतो. काही राशी शांत तर काही तापट, काही चंचल तर काही धीर गंभीर असतात. म्हणूनच लग्नाआधी कुंडली जुळवताना दोन्ही राशी परस्पर पूरक आहेत की विरुद्ध हे तपासून घेतले जाते. हे तपासायची आणखी एक सोपी पद्धत म्हणजे आपल्या राशीपासून सहाव्या राशीशी आपल्या राशीचे पटत नाही, त्यालाच शत्रू रास आणि उर्वरित मित्र रास असे संबोधले जाते.

आज आपण सतत उद्विग्न असणाऱ्या, गोंधळलेल्या अवस्थेत असलेल्या आणि निर्णय घेताना द्विधा मनस्थिती असणाऱ्या ५ राशींबद्दल जाणून घेणार आहोत. राशींचे दोष पाहताना त्यावर उपाय काय तेही ज्योतिष शास्त्राच्या आधारे पाहू आणि दुर्गुणांवर मात करू.

मेष राशीचे लोक हट्टी स्वभावाचे मानले जातात. या राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत 'हो'च ऐकायला आवडते. या राशीच्या लोकांमध्ये संयमाची कमतरता असते. इतकेच नाही तर या राशीचे लोक आपली चूकही रेटून बरोबर सिद्ध करतात. त्यामुळे त्यांचे जोडीदाराशी पटत नाही. त्यांनी दुसऱ्यांचे ऐकून घेतले, स्वतःच्या अहंकारावर नियंत्रण ठेवले तर तेदेखील जोडीदाराच्या आणि मित्रपरिवाराच्या मदतीने आनंदी जीवन जगू शकतात.

वृषभ राशीचे लोक उर्मट स्वभावाचे असतात. हा स्वभाव त्यांना प्रत्येक नात्याच्या आड येतो. आपलेच खरे करण्याच्या नादात ते दुसऱ्यांना डावलण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या वागण्यामुळे समोरच्या व्यक्तीचे मन दुखावते. अशा लोकांनी डोकं शांत ठेवून जिभेवर गोडवा आणला तर त्यांचे नाते सगळ्यांशी सुमधुर होऊ शकते. त्यांनी बोलून पश्चात्ताप करण्यापेक्षा बोलण्याआधी सावध पवित्रा घेतला पाहिजे.

मिथुन राशीचे लोक प्रेम व्यक्त करण्यात पुढे असतात. या राशीचे लोक बोलके असतात. अति प्रेमामुळे ते अति भावनिक होतात, हळवे होतात त्यामुळे निर्णय घेताना ते नात्यांमध्ये अडकतात आणि स्वतःचे नुकसान करून घेतात. त्यांनी भावनांवर आवर घातला पाहिजे आणि निर्णय घेताना तटस्थपणे विचार करायला पाहिजे.

वृश्चिक राशीचे लोक खूप तापट मानले जातात. संशयी स्वभावाचे असतात. रागाच्या भरात त्यांचे निर्णय चुकतात. याच स्वभावामुळे त्यांचे जोडीदाराशी नाते साप मुंगसासारखे असते. डोकं शांत नसल्यामुळे ते सतत गोंधळलेले असतात. अशा लोकांनी आपल्या मनावर आणि विचारांवर नियंत्रण मिळवले पाहिजे. चांगली माणसं जोडली पाहिजे आणि मोठे निर्णय घेताना त्यांचा विचार लक्षात घेतला पाहिजे.

कुंभ राशीचे लोक स्वतः मध्ये मग्न असतात. ते दुसऱ्यांचा विचार करत नाहीत. त्यामुळे ते आपल्या जवळच्या लोकांना दुखावतात. विशेषतः जोडीदाराचे मत लक्षात घेत नाहीत. त्यामुळे त्यांच्या नात्यात अंतर वाढू लागते. जिथे जोडीदाराबरोबरच नाते बिघडते तिथे अन्य नात्यांमध्येही कटुता येते. या सर्वाला कारणीभूत असतो तो त्यांचा स्वभाव. त्यावर मात केली तर त्यांच्या आयुष्यात निश्चित मधुरता येईल आणि गोंधळलेली अवस्था टिकून न राहता आयुष्य आनंदी होईल.