Maha Shivratri 2021: १२ सेकंदात घ्या १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन आणि करा मानसपूजा; हर हर महादेव!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 06:10 PM2021-03-11T18:10:00+5:302021-03-11T18:32:00+5:30

हिंदू धर्म पुराणानुसार देवाधिदेव महादेव ज्या १२ ठिकाणी शिवलिंगस्वरूपात स्वत:हून प्रगट झाले, ती ठिकाणे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखली जातात़ अनेक भाविक दरवर्षी या तीर्थक्षेत्री जाऊन दर्शन घेतात. परंतु, कोव्हिडमुळे गेल्या वर्षभरात सगळ्याच गोष्टींवर चाप बसलेला आहे. पण म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग! चला तर यंदा, या ज्योतिर्लिंगाचे घरबसल्या दर्शन घेऊन मानसपूजा करूया.

गुजरात येथील सौराष्ट्र येथे प्रभास क्षेत्री श्री सोमनाथ स्थित आहे. परकीय आक्रमणांमध्ये या मंदिरावर अनेकदा आक्रमण झाले. तरीदेखील ही वास्तू अजूनही अभेद्य आहे. या मंदिराचा पाच वेळा जिर्णोध्दार केला असून दरवर्षी महाशिवरात्रीला मंदिराचे मोठ्या प्रमाणात सुशोभिकरण केले जाते.

आंध्र प्रदेशात कृष्णा जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठावर श्रीशैलेश पर्वतावर मल्लिकार्जुन यांनी विराजमान झाले आहेत. त्याला दक्षिणेचा कैलास म्हणतात.

मध्यप्रदेशातील माळवा प्रांतात क्षिप्रा नदीच्या तटावर पवित्र उज्जैन नगरीत महाकालेश्वर यांनी आपले बस्थान मांडले आहे. प्राचीन काळात तिला अलंकापुरी म्हटले जात असे.

हे देखील मध्य प्रदेशातील माळवा प्रांतात नर्मदा नदीच्या तटावर मोरटक्का नामक ठिकाण आहे. तिथे ऊँकारेश्वर आणि मामलेश्वर अशी दोन शिवलिंग आहेत. परंतु ती दोन्ही शिवलिंग वेगळी न मानता एकच मानली जातात आणि ऊँकारेश्वर नावाने ओळखली जातात.

केदारनाथ हिमालयात स्थित आहे. शिखराच्या पूर्व दिशेला अलकनंदेच्या तटावर बदरीनाथ आणि पश्चिमेला मंदाकिनीच्या तटावर केदारनाथ वसलेले आहे. केदारनाथवरून काहीच अंतरावर हरिद्वार आणि हृषिकेश ही दोन्ही तीर्थक्षेत्र आहेत.

हे ज्योतिर्लिंग सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आहे. शिवपुराणातील कथेनुसार भीमाशंकर आसाम राज्यात गुवाहाटी येथील डोंगरप्रदेशात वसले आहे, असे म्हटले जाते. तरीदेखील नाशिक येथील भीमाशंकर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक गणले जाते.

उत्तर प्रदेशात वाराणसी स्थित काशी येथे विश्वनाथाचे स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे. गंगेच्या काठावर वसलेले तीर्थक्षेत्र अत्यंत पवित्र मानले जाते.

नाशिक जिल्ह्यात पंचवटीजवळ त्र्यंबकेश्वराचे सुंदर रेखीव मंदिर आहे. ब्रह्मगिरीजवळ गोदावरीवर हे स्थान आहे. हे ठिकाण निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. तिथे गोदावरीचा उगम होतो.

परभणी जिल्ह्यात परळी येथे श्री वैद्यनाथाचे ज्योतिर्लिंग आहे. पौराणिक कथांमध्येही वैद्यनाथाच्या तीर्थस्थळाचा उल्लेख आढळून येतो.

द्वारकेच्या पुण्यभूमीवर बारा तेरा मैल अंतरावर नागेश्वराचे शिवलिंग आहे. सर्व प्रकारच्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी भाविक नागेश्वराची प्रतिवर्षी आवर्जून पूजा करतात.

तामिळनाडू येथे रामेश्वराचे मंदिर आहे. खुद्द श्रीरामप्रभूंंनी रामसेतू बांधण्याआधी शिवशंकराची पूजा केली होती. त्यावेळी भगवान महादेव श्रीरामांवर प्रसन्न झाले आणि तिथे प्रगट झालेले ज्योतिर्लिंग श्रीरामेश्वर तीर्थ म्हणून ओळखले जाऊ लागले.

औरंगाबाद जिल्ह्यात दौलताबाद येथे बेरुल गावाजवळ घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तिथल्या मंदिराचा जिर्णोद्धार केला होता. हे तीर्थक्षेत्र शेवटचे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते.