Holika Dahan 2026: यंदा होळीत द्या 'या' ८ वस्तूंची आहुती; दारिद्र्य, रोगराई, गृहक्लेशातून मिळेल मुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 13:34 IST2026-02-19T13:29:29+5:302026-02-19T13:34:27+5:30

Holi 2026: यंदा सोमवार, २ मार्च २०२६ रोजी होलिका दहन(Holika Dahan 2026) आहे. होळी(Holi 2026) हा केवळ रंगांचा सण नाही, तर तो आपल्या आयुष्यातील नकारात्मकता जाळून सकारात्मकतेचा स्वीकार करण्याचा पवित्र दिवस आहे. होळीच्या अग्नीत श्रद्धेने विशिष्ट वस्तू अर्पण केल्यास वास्तुदोष, आजारपण आणि आर्थिक अडचणी दूर होतात, असे मानले जाते.

होळीचा सण म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. या दिवशी होलिका दहनाच्या अग्नीला अनन्यसाधारण महत्त्व असते. शास्त्रानुसार, या अग्नीत काही विशिष्ट गोष्टी अर्पण केल्यास तुमच्या जीवनातील अनेक समस्या क्षणात भस्म होऊ शकतात. यंदा २ मार्च रोजी होलिका दहन आहे, त्यानिमित्ताने खालील गोष्टी अग्नीत आवर्जून टाका:

घरात सतत कटकटी किंवा भांडणे होत असतील, तर होळीच्या अग्नीत चंदनाचे लाकूड अर्पण करा. चंदनाच्या सुगंधाने आणि त्याच्या प्रभावाने घरातील वातावरणात शांतता येते आणि घरातील क्लेश दूर होण्यास मदत होते.

गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या होळीत वापरणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरातील आणि मनातील नकारात्मक ऊर्जा जळून खाक होते आणि सकारात्मकतेचा संचार होतो.

जर तुमच्या घरात वारंवार कुणी आजारी पडत असेल किंवा आरोग्याच्या समस्या असतील, तर कापूर, लवंग आणि विड्याचे पान एकत्रितपणे होळीत अर्पण करा. यामुळे अनारोग्य दूर होऊन कुटुंबाला उत्तम स्वास्थ्य लाभते.

नवीन धान्याची पूजा करण्याची आपली परंपरा आहे. होळीच्या अग्नीत गव्हाच्या ओव्या भाजल्याने किंवा अर्पण केल्याने घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि अन्नपूर्णा मातेची कृपा कायम राहते.

पैशांची उणीव भासत असेल किंवा कर्जाचा डोंगर वाढत असेल, तर होळीत थोडी 'यज्ञ सामग्री' अर्पण करा. यामुळे देवाची विशेष कृपा राहते आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतात.

वास्तुदोष, नजरदोष किंवा कुंडलीतील ग्रहदोषांमुळे कामात अडथळे येत असतील, तर काळे तीळ हातात घेऊन अग्नीत टाका. यामुळे अनेक प्रकारचे दोष आणि बाधा दूर होतात.

एका नारळाला तूप लावून ते होळीच्या अग्नीत अर्पण केल्यास मनातील मरगळ आणि नकारात्मकता दूर होते. ज्यांना नोकरी किंवा व्यवसायात प्रगती हवी आहे, त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो.

होळीच्या अग्नीत पुरणपोळी अर्पण केल्याने घरातील पितृदोष आणि ग्रहदोषांची तीव्रता कमी होऊन समृद्धी येते. हा महानैवेद्य अर्पण केल्याने घरातील क्लेश जळून खाक होतात आणि कौटुंबिक नात्यांत पुरणासारखा गोडवा निर्माण होतो. तसेच, वर्षभर घरात अन्नाची कमतरता भासू नये म्हणून हा कृतज्ञतेचा सोहळा महत्त्वाचा मानला जातो.