Hanuman Jayanti 2026: हनुमंताला १ पुत्र होता आणि ५ भाऊ; काय होती त्यांची नावे? वाचा रंजक आणि अज्ञात पैलू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 10:16 IST2026-04-02T10:10:59+5:302026-04-02T10:16:31+5:30

Hanuman Jayanti 2026: आज हनुमान जयंती(Hanuman Jayanti 2026) हनुमंत, बजरंग बली, मारुती राया अशा अनेक नावांनी आपण रामभक्त हनुमानाची उपासना करतो. पण त्यांच्याबद्दल बरीचशी माहिती आपल्याला माहीतही नसते. हनुमंत चिरंजीवी झाले आणि रामकार्यात सिंहाचा वाटा उचलला, याव्यतिरिक्त त्यांच्या आयुष्याशी निगडित काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

हनुमंत हे रुद्रावतार होते हे आपण जाणतोच. पण त्यांच्याशी संबंधित ही प्राथमिक माहिती प्रत्येकाला असायलाच हवी. ज्यात त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तसेच त्यांच्या अवतार कार्याशी निगडित गोष्टींचे ज्ञान मिळते. चला तर जाणून घेऊ हनुमंताची भावंडं, त्यांचे अवतार कार्य आणि वैयक्तिक आयुष्याशी निगडित महत्त्वपूर्ण माहिती.

हनुमंताच्या पुत्राचे नाव मकरध्वज होते. वास्तविक पाहता हनुमंत ब्रह्मचारी! तरीदेखील एकदा लंकेतून परतत असताना हनुमंताच्या शरीरावरील घामाचा एक थेंब समुद्रात पडला आणि तो एका मासोळीने ग्रहण केला,ती गर्भवती झाली आणि तिला जो पुत्र झाला त्याचे नाव मकरध्वज ठेवण्यात आले.

हनुमंताला गदा भगवान कुबेरांनी दिली. जेव्हा मूर्च्छित पडलेला बाल हनुमान शुद्धीवर येत नव्हता तेव्हा पवनदेवाने सर्व देवांना वेठीस धरले. सगळ्या देवांनी त्या बालकाला आशीर्वाद आणि आपल्याकडील एक एक शस्त्र आशिर्वादासह दिले. तेव्हा भगवान कुबेरांनी त्या पराक्रमी बालकाला गदा भेट दिली. त्या गदेचे नाव 'कौमुदगी' होते.

ब्रह्माण्डपुराणात केलेल्या उल्लेखानुसार हनुमंताला ५ भाऊ होते. ते सगळे विवाहित होते. त्यांचा कुटुंबकबिला होता. त्यांची नावे - मतिमान, श्रुतिमान, केतुमान, गतिमान, धृतिमान! या सगळ्यांमध्ये हनुमान ज्येष्ठ होते. रामभक्तीमुळे हनुमंताचे नाव आणि कार्य अजरामर झाले आणि बाकी भाऊ नाममात्र राहिले.

हनुमंताने लक्ष्मणाला उपचारासाठी संजीवनी बुटी मिळावी म्हणून हिमालयातून द्रोणागिरी पर्वत उचलून आणला आणि उपचार पूर्ण झाल्यावर तो जसा आणला तसा परत नेऊनही ठेवला.

आपण अनेकदा पंचमुखी हनुमानाची प्रतिमा पाहिली असेल. त्यात वेगवेगळे अवतार एकत्र सामावले आहेत. ज्यात गरुड, नृसिंह, वराह, हयग्रीव आणि वानर मुख यांचा समावेश आहे.

चिरंजीवी हनुमान आजही जिवंत आहेत आणि रामभक्तांच्या मदतीसाठी तत्पर आहेत अशी भाविकांची श्रद्धा आहे. ते कधी हिमालयाच्या कुशीत तर कधी गंधमादन पर्वतावर राहून राम नामाचा अखंड जप करतात.

हनुमंत वानर योनीत जन्माला आले असले तरी सकल शास्त्रात निपुण होते. त्यांना नऊ विद्या विशेष अवगत होत्यात. ज्यात व्याकरण, ज्योतिष, धर्मशास्त्र, कालज्ञान, राजनीती, योग, तर्कशास्त्र, आयुर्वेद, कलासंगीत यांचा समावेश आहे.