Dnyaneshwari Jayanti 2021: विश्वाला पसायदानाचे अमृत देणाऱ्या ज्ञानेश्वरीची जयंती; पाहा, इतिहास आणि मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 08:16 AM2021-09-27T08:16:25+5:302021-09-27T08:20:35+5:30

Dnyaneshwari Jayanti 2021: ज्ञानेश्वरी ही गीतेवरील सर्वश्रेष्ठ टीका होय. ज्ञानेश्वरांनी तत्त्वज्ञान व साक्षात्कार यांचे अतिशय सुंदर व प्रभावी वर्णन केले आहे.

मराठी भाषेचा अभिमान, भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, वारकरी संप्रदायाचे दैवत, योगी, तत्त्वज्ञ, संतकवी अशा अनेकविध गोष्टींसाठी ओळखले जाणारे संत म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. संत ज्ञानेश्वरांनी गीतेवर रचिलेली टीका म्हणजे ज्ञानेश्वरी. (Dnyaneshwari Jayanti 2021)

भावार्थदीपिका, ज्ञानदेवी अशी या ग्रंथाची पर्यायी नावे आहेत. प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेले नाही. संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरांची ती ज्ञानेश्वरी वा ज्ञानदेवांची ती ज्ञानदेवी अशी नावे पुढीलांनी रूढ केली असावीत, असे सांगितले जाते. (Sant Dnyaneshwar Maharaj)

या ज्ञानेश्वरीला तब्बल ७३० पेक्षा अधिक वर्षे पूर्ण झाली असून, भाद्रपद वद्य षष्टी ही ज्ञानेश्वरीची जयंती मानली जाते. शके १२१२ किंवा इ. स. १२९० मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली, असे म्हटले जाते. (Sant Dnyaneshwar Mauli)

ज्ञानेश्वरीची एकनाथपूर्वकालीन विश्वसनीय प्रत अद्याप मिळालेली नाही. तिची जुन्यात जुनी प्रत मिळविण्याचे अनेक प्रयत्न झाले. ज्ञानेश्वरी ही गीतेवरील मराठीतील पहिली ओवीबद्ध टीका आहे. निवृत्तिनाथांच्या कृपादृष्टीखाली श्रोत्यांसमोर ज्ञानेश्वरांनी केलेले हे काव्यमय प्रवचन केले. ज्ञानेश्वरांच्या ठायी तत्त्वज्ञान, काव्य आणि आत्मानुभूती यांचा झालेला अद्भुत त्रिवेणीसंगम हेच त्यांच्या गीतेवरील भाष्याचे महान वैशिष्ट्य होय, असे मत अभ्यासकांनी मांडले आहे.

मराठी भाषेतून विश्वात्मक देवाकडे जगत्कल्याणासाठी पसायदानाचे अमृतदान मागणाऱ्या ज्ञानेश्वरीच्या जयंतीनिमित्त या ग्रंथाबद्दल अभ्यासकांनी मांडलेल्या मतांचा घेतलेला हा थोडक्यात आढावा. ज्ञानेश्वरी हा एक श्रोतृसंवाद आहे. ज्ञानेश्वरीच्या अठरा अध्यायांपैकी नऊ अध्यायांत ज्ञानेश्वरांनी श्रोत्यांशी प्रकट संवाद साधलेला आहे. ज्ञानेश्वरी वाचताना ज्ञानेश्वर आपल्या अगदी निकट येऊन आपल्याशी बोलत आहेत, असे आपल्याला वाटते. पण असे असूनही ज्ञानेश्वरी कधी बहिर्मुख होत नाही तिची अंतर्मुखता ती सोडत नाही.

ज्ञानेश्वरी ही गीतेवरील सर्वश्रेष्ठ टीका होय. ज्ञानेश्वरांनी तत्त्वज्ञान व साक्षात्कार यांचे अतिशय सुंदर व प्रभावी वर्णन केले आहे. ज्ञानेश्वरांचे सृष्टिनिरीक्षण किती सखोल व सूक्ष्म होते, हेही त्यातून दिसून येते, असे मत रामचंद्र दत्तात्रेय रानडे व्यक्त करतात. ज्ञानेश्वरांनी श्रोत्यांसमोर ज्ञानेश्वरी सांगितली. तसेच श्रोत्यांशी वेळोवेळी संवादही साधला. त्यांच्या या श्रोतृसंवादाची काही वैशिष्ट्ये स्पष्टपणे दिसून येतात.

ज्ञानेश्वरीच्या या श्रोतृसंवादाचे एक महत्त्वाचे आणि अनन्य साधारण वैशिष्ट्य म्हणजे श्रोताहा या निर्मितिप्रक्रियेत सहभागी आहे, याची स्पष्ट जाणीव ज्ञानेश्वरांना होती. यातील संवाद सविस्तर आणि मनापासूनचे आहेत. यातून ज्ञानेश्वरांच्या अलौकिक, आंतरिक व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार झालेला दिसून येतो. आपले विवेचन फुलवताना ज्ञानेश्वर श्रोत्यांच्या प्रगट व संभाव्य प्रतिक्रिया लक्षात घेतात.

ज्ञानेश्वरांच्या श्रोतृसंवादात अंतर्मुखता असल्यामुळे त्यांचा श्रोता हा ज्ञानेश्वरीच्या आशयाचाच एक भाग होतो, असे अभ्यासक सांगतात. ज्ञानेश्वरांवर नाथसंप्रदाय आणि भागवत संप्रदाय या दोन संप्रदायांचे संस्कार होते. या दोन्ही संप्रदायांतील विचारसरणींचे ऐक्य ज्ञानेश्वरांनी घडवून आणले आणि ज्ञानभक्तीचे एक नवे तत्त्वज्ञान जगाला दिले.

ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात ज्ञानेश्वरांनी कुंडलिनीच्या संदर्भात जे विवेचन केले आहे, ते सर्व नाथपंथातील विचारसरणीचे आहे. नवव्या अध्यायात आलेल्या हठयोगाच्या विषयाकडे ज्ञानेश्वर नाथपंथीयांच्या दृष्टीनेच पाहतात. नाथपंथाच्या अशा काही खुणा ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी दिसतात. भक्तीचे तत्त्व वारंवार मांडलेले दिसते. ज्ञानेश्वरीचे मुख्य अधिष्ठान भक्ती हेच आहे, असे प्रकर्षाने दिसते, असे मत डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी मांडले आहे.

विश्वाचे वर्णन करताना ज्ञानेश्वर सर्वाधिक रमतात. आकाशातील ताऱ्यांचे तेज, ते एकमेकांवर आपटल्यावर होणारा चक्काचूर, आकाशातील रंगांची वर्णने, ढगांची हालचाल, त्यांच्यामागे लपणारा सूर्य-जो स्वतःच लपून ढगाचे दर्शन घडवतो, आकाशात झेपावणारे चिलट त्यात भरारी आणि बुडी मारणारा पारवा आणि विहार करणारा गरुड किंवा झाडावर झेप घेणारा पक्षी ही सर्व उदाहरणे तत्त्वज्ञानाचे दर्शन घडविण्यासाठी वापरली आहेत.

विश्वरूपात अणुपरमाणू मावेल एवढीही पोकळी चैतन्य सदृश्य श्रीकृष्णाने ठेवलेली नाही हा विचार सर्वार्थाने वैज्ञानिक आहे. ज्ञानेश्वरीत स्त्रियांची वर्णने चौफेर आहेत. कोठलेही जगाच्या पाठीवरचे तत्त्वकाव्य इतके प्रत्ययकारी आणि समृद्ध नाही. एवढे सगळे करून शेवटी ज्ञानेश्वर तटस्थच राहतात, असे सांगितले जाते.

ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या अखेरीस ज्ञानेश्वरांचे पसायदान असून, ज्ञानेश्वरी हा एक वाग्यज्ञ होता. या वाग्यज्ञाने विश्वात्मक देव संतुष्ट व्हावा आणि त्याने मला पसायदान द्यावे, अशी प्रार्थना ज्ञानेश्वरांनी केलेली आहे. या पसायदानात विश्वात्मक देव, श्रीविश्वेश्वराव या शब्दांनी ज्ञानेश्वरांनी त्यांचे गुरू निवृत्तिनाथ यांचा निर्देश केल्याचे दिसते.

पसायदानात ज्ञानेश्वरांनी स्वतःसाठी काहीच मागितलेले नाही. जे खलप्रवृत्तीचे असतील, त्यांना सत्कर्मांत रस निर्माण व्हावा, सर्वांमध्ये जीवाभावाची मैत्री निर्माण व्हावी, जो जे वांछिल ते त्याला मिळावे. जे चंद्रासारखे आहेत, पण चंद्रावर असतो तसा कलंक नाही, जे सूर्य आहेत, पण ज्यांचा ताप जगाला होत नाही, त्यांच्याशी सर्वांचे नाते जडावे, अशी विनवणी त्यांनी केली आहे.