परभणी : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना परभणीतून अन्नधान्य, कपडे आणि चाऱ्याची मदत देण्यात आली आहे. आ. डॉ. राहुल पाटील यांच्या पुढाकारातून २७ जुलै रोजी मदतीच्या बसेस कोकणाकडे रवाना झाल्या.
मागील आठवड्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीने हाहाकार उडाला. अनेक गावे पुराच्या पाण्याखाली गेली तर दरड कोसळून मोठी जीवित हानी झाली. कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निर्माण झालेल्या या संकटकाळात परभणी येथील शिवसेेनेच्या वतीने आ. डॉ. राहुल पाटील यांनी पुढाकार घेत मदत देण्याचा निर्णय घेतला. अन्नधान्य, कपडे, ब्लँकेट आणि जनावरांसाठी चारा अशी मदत देण्यात आली. येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातून मंगळवारी दुपारी आ. डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत अत्यावश्यक साहित्य असलेल्या दोन बसेस कोकण, पश्चिम महाराष्ट्राकडे रवाना करण्यात आल्या. या वेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, संजय गाडगे, सदाशिव देशमुख, राजू कापसे, रवी पतंगे, दिनेश बोबडे, नंदू अवचार पाटील, ज्ञानेश्वर पवार, अनिल डहाळे, संदीप भंडारी, अरविंद देशमुख, नवनीत पाचपोर आदींची प्रमुख उपस्थिती होती. उपशहर प्रमुख मारोती तिथे, संभानाथ काळे, उद्धव मोहिते, बापू फुलपगार, राहुल खटींग, मकरंद कुलकर्णी, विशू डहाळे, बाळराजे तळेकर, एस. टी. कामगार सेनेचे बालाजी रेवणवार, कुलदीप ठाकूर, रामेश्वर तोडकरी हे शिवसैनिक मदत घेऊन रवाना झाले आहेत.
शिवसेनेने नेहमीच जपली सामाजिक बांधिलकी
कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय मदत दिली जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार अंगीकारून शिवसैनिक मदतीसाठी नेहमीच तत्पर असतात. याच विचारातून सामाजिक बांधिलकी जपत तातडीची मदत म्हणून परभणीतून अत्यावश्यक गरजेच्या वस्तू पाठविल्या जात आहेत, असे आ. डॉ. राहुल पाटील यांनी सांगितले.