परभणी-परळी रेल्वेमार्गालगत ड्रोन सर्वेक्षण; ५०० हेक्टर जमिनीवर खुणा केल्याने शेतकरी धास्तावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 19:46 IST2026-02-25T19:45:49+5:302026-02-25T19:46:47+5:30
आता हे काय नवीन? मध्यरात्री ड्रोन घोंघावले अन् जमिनीवर चुन्याचे पट्टे ओढले; परभणीतील शेतकरी चिंतेत

परभणी-परळी रेल्वेमार्गालगत ड्रोन सर्वेक्षण; ५०० हेक्टर जमिनीवर खुणा केल्याने शेतकरी धास्तावले
दैठणा (जि. परभणी) : परभणी तालुक्यातील दैठणा परिसरात परभणी-परळी रेल्वेमार्गालगत अज्ञात व्यक्तींकडून ड्रोनच्या साहाय्याने सर्वेक्षण करण्यात येत असल्याची माहिती पुढे आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी दैठणा पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.
दैठणा परिसरातील पोखर्णी, आंबेटाकळी, पोरवड व धोंडी या गावांच्या शिवारातून जाणाऱ्या रेल्वे पटरीच्या दोन्ही बाजूंनी सुमारे प्रत्येकी एक किलोमीटर अंतरावर चुना-मातीने रेखांकन करण्यात आल्याचे मंगळवारी निदर्शनास आले. अंदाजे ५०० हेक्टर क्षेत्रावर हे चिन्हांकन केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित जमिनी अधिग्रहित होणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. एकीकडे प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी दैठणा परिसरातील जमिनींचे संपादन सुरू असून, नुकतीच त्याची मोजणी तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा नव्याने ड्रोन सर्वेक्षण व रेखांकन होत असल्याने शेतकरी अधिकच साशंक झाले आहेत. आता हे काय नवीन, असा सवाल उपस्थित करत शेतकरी प्रशासनाकडून स्पष्ट भूमिकेची मागणी करत आहेत.
या संदर्भात मंगळवारी शेतकरी दैठणा पोलिस ठाण्यात जमा झाले. त्यांनी ठाणेदार अशोक जायभाये यांच्याशी चर्चा करून सर्व प्रकाराची माहिती दिली. ठाणेदार जायभाये यांनी प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन योग्य ती माहिती लवकरच दिली जाईल, असे सांगितले. या संदर्भात मंगळवारी शेतकरी दैठणा पोलिस ठाण्यात जमा झाले. त्यांनी ठाणेदार अशोक जायभाये यांच्याशी चर्चा करून सर्व प्रकाराची माहिती दिली. ठाणेदार जायभाये यांनी प्रकरणाची माहिती घेऊन योग्य ती माहिती लवकरच दिली जाईल, असे सांगितले.
घाडगे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
दैठणा परिसरातील चार गावांच्या शिवारात रेल्वे पटरीलगत चुना मातीने रेखांकन केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे शक्तिपीठ महामार्गाचे त्रांगडे सुरू असून, दुसरीकडे या रेखांकनाने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. यावर प्रशासनाने स्पष्टता द्यावी, असे साकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश घाडगे यांनी शेतकऱ्यांसोबत जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांना घातले.