कोरोनाच्या अनुषंगाने मनपाच्या दवाखान्यात ३ महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीने हॉस्पिटल मॅनेजर २, स्टाफ नर्स ५०, एक्स रे टेक्निशियन २, ईसीजी टेक्निशियन २, लॅब टेक्निशियन ४, फार्मासिस्ट ५, स्टोअर ऑफिसर ३, डाटा इन्ट्री ऑपरेटर ५ आणि स्वीपर (वॉर्ड बॉय) ३० अशा एकूण १०३ पदांसाठी २८ एप्रिल ते १५ मेपर्यंत थेट मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास आणखी आठवडाभराचा कालावधी बाकी असताना थेट मुलाखत भरती प्रक्रियेस उपलब्ध पदांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात उमेदवार येत असल्याने व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी प्रत्यक्ष मुलाखत प्रक्रिया बंद करण्यात येत असल्याचे मनपाने स्पष्ट केले आहे.
प्रहार संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
यासंदर्भात प्रहार जनशक्ती संघटनेने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यात मनपाची ही भूमिका चुकीची असून ठराविक व मर्जीतील उमेदवारांना स्थान देण्यासाठी हे षडयंत्र असण्याची शक्यता असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मनपाने जाहिरातीत दिल्याप्रमाणे उपस्थित सर्व उमेदवारांच्या १५ मेपर्यंत मुलाखती घ्याव्यात. पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया राबवावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधणे यांनी दिला आहे.