लॉकडाऊन काळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. नोकरीच नसल्याने विवाह लांबणीवर टाकण्याचे प्रकार जिल्ह्यात घडले. परिणामी नोंदणी विवाह कमी झाले आहेत.
दरवर्षी जिल्ह्यात सरासरी ६५ विवाह नोंदणी पद्धतीने होतात. मात्र, कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे हे प्रमाण निम्म्याने घटले आहे. जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट महिन्यांनंतर दरवर्षीच नोंदणीत वाढ होत असते.
- के. आर. मोरे,
विवाह नोंदणी अधिकारी
लॉकडाऊनमध्ये एकही नोंदणी नाही
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्च महिन्यापासून जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे सर्व व्यवहार बंद राहिले.
लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांत एकाही विवाहाची नोंद झाली नाही. त्यापूर्वीच्या महिन्यांत मात्र नोंदणी झालेली आहे.
विवाह टाकले लांबणीवर
लॉकडाऊन काळात काही युवकांना नोकरी गमवावी लागली. मोठ्या शहरातील कंपन्यांमध्ये नोकरी करणारे हे युवक गावाकडे परतले होते.
नोकरीच नाही तर विवाह करायचा कसा, असा प्रश्न या युवकांना सतावत होता. त्यामुळे कोरोना संसर्ग ओसरल्यानंतर नवीन कंपनी जॉईन करून त्यानंतरच विवाहाचे पाहू, असा विचार करून अनेकांनी विवाह लांबणीवर टाकले. त्याचाही परिणाम या काळातील विवाह नोंदणीत घट होण्यावर झाला आहे.
आर्थिक अडचणींचाही विचार
कोरोना संसर्ग काळात युवकांना नोकरी गमवावी लागल्याने त्यांच्यासमोर आर्थिक अडचणीही उभ्या ठाकल्या. त्यामुळे या काळात विवाह केल्यास या समस्या आणखीच वाढतील. असाही विचार करून अनेकांनी आपले विवाह लांबणीवर टाकले.