धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 17:15 IST2026-05-08T17:14:25+5:302026-05-08T17:15:14+5:30
रुग्णवाहिका आली खरी, पण ती गावापर्यंत पोहोचू शकली नाही.

फोटो - आजतक
ओडिशाच्या कालाहांडी जिल्ह्यातील मालपाडा गावात पावसानंतर सर्वत्र चिखल पाहायला मिळाला. गावाला मुख्य रस्त्याशी जोडणारा कच्चा रस्ताच खराब झाला. याच दरम्यान देवानंद माझी यांची पत्नी ललिता हिला प्रसूती कळा सुरू झाल्या. कुटुंबियांनी तातडीने १०२ जननी रुग्णवाहिकेला फोन केला. काही वेळात रुग्णवाहिका येईल आणि ललिताला रुग्णालयात नेले जाईल, अशी सर्वांना आशा होती. मात्र पाऊस रस्त्यावर चिखल असल्याने हे शक्य झालं नाही.
रुग्णवाहिका आली खरी, पण ती गावापर्यंत पोहोचू शकली नाही. चिखलामुळे गाडी फसण्याची भीती असल्याने चालकाने अंबागुडा मुख्य रस्त्यावरच रुग्णवाहिका थांबवली. तिथून गाव एक किलोमीटर होतं. दुसरीकडे घरात ललिता वेदनांनी विव्हळत होती. तिची प्रकृती बिघडत चालली होती. तिला रुग्णालयापर्यंत कसं पोहोचवायचं, हा सर्वात मोठा प्रश्न कुटुंबासमोर उभा होता.
पावसामुळे रस्ता पूर्णपणे खराब
गावातील काही तरुण आणि नागरिक मदतीला धावून आले. घरातून लाकडी खाट बाहेर काढली. कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि गावातील तरुणांनी ललिताला काळजीपूर्वक त्या खाटेवर ठेवलं. सोबत गावातील आशा सेविकाही मदतीला धावल्या. पावसामुळे रस्ता पूर्णपणे खराब झाला होता. कुठे चिखल होता तर कुठे पाणी साचलं होतं. पण ग्रामस्थ थांबले नाहीत. ललितावा रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची धावपळ सुरू झाली.
प्रशासनाविरोधात गावात तीव्र संताप
ललिताला वेळेवर रुग्णालयात पोहोचवणं, हेच प्रत्येकाचं एकमेव ध्येय होतं. एक किलोमीटरचा चिखलमय आणि खडतर प्रवास पार केल्यानंतर ग्रामस्थ अखेर मुख्य रस्त्यावर पोहोचले, जिथे रुग्णवाहिका त्यांची वाट पाहत होती. त्यानंतर ललिताला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. या घटनेनंतर प्रशासनाविरोधात गावात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
रुग्णांना रुग्णालयात नेणं हे सर्वात मोठं आव्हान
रस्त्याअभावी रुग्णाला अशा त्रासाला सामोरं जाण्याची ही पहिलीच वेळ नसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. गेल्या वर्षीही अशाच प्रकारे एका रुग्णाला खाटेवरून रुग्णालयात न्यावं लागलं होतं. वारंवार ब्लॉक प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडे रस्ता बांधण्याची मागणी केली, पण प्रत्येक वेळी फक्त आश्वासनंच मिळाली, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटतो आणि रुग्णांना रुग्णालयात नेणं हे सर्वात मोठं आव्हान ठरतं.
रस्ते आणि विकासाची मोठी आश्वासनं
निवडणुकीच्या वेळी नेते गावात रस्ते आणि विकासाची मोठी आश्वासनं देतात, पण प्रत्येक पावसाळ्यात वास्तव समोर येतं अशी भावना स्थानिक लोक व्यक्त करत आहेत. रस्ता नसल्याची किंमत गरीब आणि आजारी लोकांना मोजावी लागत आहे. कालाहांडीची ही घटना अशा शेकडो ग्रामीण भागांचं प्रतिनिधित्व करते, जिथे आजही मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. तिथे रुग्णवाहिका तर आहे, पण पोहोचायला रस्ता नाही; सरकारी योजना आहेत, पण गावापर्यंत त्या पोहोचत नाही.