अति घाई नडली! त्रिपुराच्या राज्यपालांची आधी वाजपेयींना श्रद्धांजली; मग माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 15:27 IST2018-08-16T15:20:39+5:302018-08-16T15:27:45+5:30

नेटिझन्सच्या टीकेनंतर श्रद्धांजलीचं ट्विट डिलीट

tripura governor tathagata roy paid tribute before atal bihari vajpayees death | अति घाई नडली! त्रिपुराच्या राज्यपालांची आधी वाजपेयींना श्रद्धांजली; मग माफी

अति घाई नडली! त्रिपुराच्या राज्यपालांची आधी वाजपेयींना श्रद्धांजली; मग माफी

अगरताळा: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. त्यांच्यावर दिल्लीतीलएम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाजपेयी यांच्या प्रकृतीत कालपासून सुधारणा होत नसल्याचं एम्सनं मेडिकल बुलेटिनच्या माध्यमातून सांगितलं आहे. वाजपेयी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देशभरात प्रार्थना सुरू असताना त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांना ट्विट करुन श्रद्धांजली वाहिली. मात्र काही वेळातच रॉय यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि मग त्यांनी ट्विट डिलीट करुन माफी मागितली. 



तथागत रॉय यांनी ट्विट करुन अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं. 'भारताचे माजी पंतप्रधान, उत्तम वक्ते आणि सहा दशकांपासून राजकीय क्षितिजावर चमकणारे, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे खासगी सचिव म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणारे, अतिशय बुद्धिमान आणि विनम्र असणारे अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन झालं आहे. ओम शांती,' असं ट्विट रॉय यांनी केलं होतं. यानंतर नेटिझन्सनी रॉय यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. 


नेटिझन्सच्या प्रतिक्रिया येऊ लागल्यानंतर राज्यपाल रॉय यांना त्यांना चुकीची जाणीव झाली. यानंतर रॉय यांनी पुन्हा ट्विट केलं आणि माफी मागितली. 'मला माफ करा. टीव्हीवरील वृत्त पाहून मी ट्विट केलं होतं. अद्याप याबद्दलची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मी माझं आधीचं ट्विट डिलीट केलं आहे. मला पुन्हा एकदा माफ करा,' असं रॉय यांनी ट्विटमध्ये म्हटलं. 
 

Web Title: tripura governor tathagata roy paid tribute before atal bihari vajpayees death