पणजी : काश्मीरमध्ये सैन्यदलाच्या छावणीवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याची भारताने अत्यंत गंभीर दखल घेतली असून, हा पाकिस्तान पुरस्कृत हल्ला असल्याने त्यास चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी येथे दिला.गोव्यातील सेंट फ्रान्सिस झेवियर पार्थिव दर्शन सोहळ्याची व्यवस्था पाहण्यासाठी पर्रीकर आले होते. पर्रीकर म्हणाले, की काश्मीरमध्ये ७२ टक्के मतदानाची नोंद झाली. त्यातून काश्मिरी माणूस मोठ्या प्रमाणात लोकशाही प्रक्रियेतसहभागी होतो, याची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली. पाकिस्तानला नेमके हेच झोंबल्याने त्यांनी निवडणुकीनंतर हल्ले चालविले आहेत. अतिरेक्यांकडे पाकिस्तानी बनावटीची शस्त्रास्त्रे होती. पाकिस्तानला या हल्ल्याचे प्रत्युत्तर मिळेल. भारत काय करणार याबद्दल मी बोलणार नाही; परंतु जे काही करायचे ते निश्चितपणे केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. (प्रतिनिधी)
> सैन्यदलाच्या छावणीवर हल्ला करून लोकांत दहशत निर्माण करण्याचे अतिरेक्यांचे कारस्थान होते. सैन्यदलाने अतिरेक्यांना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचू न देता त्यांचा हा डाव उधळून लावला. भारताचे आठ जवान शहीद झाल्याचे दु:ख आहेच. मात्र सर्व अतिरेक्यांना कंठस्नान घालणाऱ्या जवानांचा अभिमानही आहे, असे संरक्षणमंत्री म्हणाले.