Rajasthan Political Crisis: राजस्थानच्या राजकीय संघर्षात भाजपाची एन्ट्री; “आम्ही साधू नाही, संधी मिळाली तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 15:12 IST2020-07-14T12:38:42+5:302020-07-14T15:12:33+5:30
Rajasthan Political Crisis: भाजपाच्या या बैठकीत सतीश पूनिया, गुलाबचंद कटारिया, राजेंद्र राठोड, चंद्रशेखरसह अन्य प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत.

Rajasthan Political Crisis: राजस्थानच्या राजकीय संघर्षात भाजपाची एन्ट्री; “आम्ही साधू नाही, संधी मिळाली तर...
जयपूर – राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भाजपाही सक्रीय होताना दिसत आहे. राजस्थानमध्येभाजपा नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीबाबत भाजपाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र राठोड यांना विचारलं असता त्यांनी राज्याच्या राजकीय परिस्थितीवर विचारविनीमय करण्यासाठी बैठक होत असल्याचं सांगितलं. तसेच सरकार बनवण्याबाबत विचारलं असता त्यांनी आम्ही साधू नाही, संधी मिळाली तर नक्कीच आमच्या बाजूने वळवू असं सूचक विधान केले आहे.
भाजपाच्या या बैठकीत सतीश पूनिया, गुलाबचंद कटारिया, राजेंद्र राठोड, चंद्रशेखरसह अन्य प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत. या बैठकीसोबतच भाजपा पहिल्यांदाच राजस्थानच्या राजकीय संघर्षात उतरल्याचं दिसून येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राजस्थानमधील राज्य नेतृत्व केंद्रीय नेतृत्वाच्या संपर्कात राहून प्रत्येक हालचालींबाबत त्यांना माहिती देत आहेत. (Rajasthan Political Crisis)
भाजपा नेते गुलाबचंद कटारिया यांनी सांगितले की, आम्ही सुरुवातीपासून सांगतोय हा काँग्रेसमधील अंतर्गत वाद आहे. आम्हाला जेव्हा वाटेल आमच्या भूमिकेची गरज आहे, त्यावेळी आम्ही एकत्र बसून चर्चा करु, सध्या राज्यात जे सुरु आहे त्याबाबत भाजपा (BJP) नेत्यांमध्ये बैठक होईल, त्यामध्ये पुढील विचार आणि भूमिका ठरवली जाईल. तसेच जर काँग्रेसला वाटत असेल भाजपा त्यांचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे तर त्यांनी याची चौकशी करावी, कोणतंही तथ्य नसताना उगाच राजकीय फायद्यासाठी विधानं करु नये असं त्यांनी काँग्रेसला (Congress) बजावलं आहे.
ज्योतिरादित्य शिंदेंची सोडचिठ्ठी आणि सचिन पायलट हकालपट्टीच्या पार्श्वभूमीवर, राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यासाठी इतर युवा नेत्यांना काँग्रेसमध्ये पुढे येऊच दिलं जात नाही, हा भाजपाने केलेला आरोप पटतो का? #Rajasthan#SachinPailot
— Lokmat (@MiLOKMAT) July 14, 2020
त्याचसोबत काँग्रेसच्या कोणत्याही आमदारासोबत आमची चर्चा नाही, पण अपक्ष आमदारांशी आमची बोलणी सुरु आहेत. राज्यसभा निवडणुकीवेळीही आमची चर्चा झाली होती, त्यात पाप काय? एसओजीच्या जेवढ्या नोटीस काँग्रेसच्या लोकांना मिळाल्या आहेत त्यामुळे हे लोक एकमेकांना भीती दाखवत आहेत असं कटारियांनी सांगितले तर काँग्रेस एका युवा नेतृत्वाकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे काँग्रेसमध्ये वाद सुरु आहेत. काँग्रेसने अशा नेत्याला मुख्यमंत्री बनवले ज्यांना ५ वर्ष कोणीही पाहिले नव्हते. सध्या आम्ही वेट अँन्ड वॉचच्या भूमिकेत आहोत असं भाजपा नेते राजेंद्र राठोड यांनी सांगितले. (Rajasthan Political Crisis)