राजस्थानात गेहलोत-पायलट यांच्यातील संघर्ष काँग्रेस- भाजपामध्ये झाला परावर्तित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 06:17 IST2020-07-18T22:32:06+5:302020-07-19T06:17:31+5:30

आणखी ध्वनीफिती येण्याची शक्यता

In Rajasthan, the Gehlot-Pilot conflict was reflected in the Congress-BJP | राजस्थानात गेहलोत-पायलट यांच्यातील संघर्ष काँग्रेस- भाजपामध्ये झाला परावर्तित

राजस्थानात गेहलोत-पायलट यांच्यातील संघर्ष काँग्रेस- भाजपामध्ये झाला परावर्तित

- शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट यांच्यातील संघर्ष आता काँग्रेस विरुद्ध भाजप असा बदलताना दिसत आहे.

भंवरलाल शर्मा, गजेंद्र सिंह शेखावत यांच्या ऑडिओ टेपबाबत भाजपने सीबीआय चौकशीची मागणी केली असून, त्यावर पलटवार करताना काँग्रेसने म्हटले आहे की, स्रूप गेटमध्ये मुख्य भूमिका निभावणारेच आज आम्हाला विचारताहेत की टॅपिंग कशी झाली? गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये टॅपिंगचा यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे. नितीशकुमार यांनी तर, यांना फोन टॅप करण्याची सवयच आहे, असे म्हटलेले आहे.

राजस्थानमध्ये राजकारण्यांचे फोन अवैधरीत्या टॅप करण्यात आले असून, त्याची सीबीआय चौकशी केली पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे. या टॅपिंगबाबत त्यांनी अनेक प्रश्नांची सरबत्ती केली असून, त्याबाबत गेहलोत सरकारकडून खुलासाही मागितला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस आगामी काही काळात आणखी टेप जारी करू शकते. यामुळे भाजपचा पर्दाफाश करण्यात येईल.

पक्ष प्रवक्ते पवन खेडा यांनी म्हटले आहे की, टॅपिंगमध्ये आता तर केवळ एका केंद्रीय मंत्र्याचे नाव आले आहे. पुढे तर अनेक नेते व बडे नेते यात गुंतलेले असल्याचे समोर येईल. मानेसरमध्ये पायलट समर्थक आमदारांना राजस्थान पोलिसांना भेटूही दिले नाही व या आमदारांना मागच्या दाराने बाहेर काढून कर्नाटकमध्ये हलवले जात आहे.

बीटीपीच्या दोन आमदारांचा सरकारला पाठिंबा

भारतीय ट्रायबल पार्टीच्या दोन आमदारांनी गेहलोत सरकारला पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्यासमवेत पत्रपरिषद घेऊन त्यांनी ही घोषणा केली. राजकुमार रोआत आणि रामप्रसाद अशी या दोन आमदारांची नावे आहेत. राज्याच्या विकासाचे आश्वासन पूर्ण करण्याच्या अटीवर हा पाठिंबा दिला आहे.

काँग्रेसच्या अंतर्गत संघर्षात जनतेची हेळसांड -वसुंधरा राजे

जयपूर : काँग्रेसच्या अंतर्गत संघर्षात जनतेची हेळसांड होत आहे, हे दुर्दैवी आहे, असे भाजपच्या राष्टÑीय उपाध्यक्ष वसुंधरा राजे यांनी म्हटले आहे. राज्यातील राजकीय नाट्यावर प्रथमच त्यांनी भाष्य केले आहे. त्यात म्हटले आहे की, अंतर्गत संघर्षाचे खापर काँग्रेस भाजपवर फोडू पाहत आहे. ते खपवून घेतले जाणार नाही.

राष्ट्रपती राजवट लागू करा -मायावती

राजस्थानमधील अस्थिर राजकीय स्थितीची दखल घेऊन राज्यपालांनी राज्यात राष्टÑपती राजवट लागू करण्याची शिफारस करावी, अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केली आहे.

Web Title: In Rajasthan, the Gehlot-Pilot conflict was reflected in the Congress-BJP