ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 13:41 IST2025-05-25T13:40:08+5:302025-05-25T13:41:14+5:30
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारताच्या हवाई सुरक्षा प्रणालीने पाकिस्तानकडून झालेले अनेक भीषण हल्ले रोखले होते. या कामात एस-४०० सह भारताची इतर सुरक्षा प्रणाली यशस्वी ठरली होती. मात्र ऑपरेशन सिंदूरमधून भारताच्या सुरक्षा यंत्रणांसाठीही काही धडे मिळाले आहेत. तसेच भविष्यातील संकटांचा विचार करून काही सुधारणा तातडीने कराव्या लागणार आहेत.

ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे नष्ट करून बदला घेतला होता. त्यानंतर सुमारे तीन दिवस चाललेल्या संघर्षात भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानकडून होत असलेले हल्ले परतवून लावतानाच पाकिस्तानमधील महत्त्वपूर्ण हवाई तळ उद्ध्वस्त केले होते. या कारवाईदरम्यान, भारताच्या हवाई सुरक्षा प्रणालीने पाकिस्तानकडून झालेले अनेक भीषण हल्ले रोखले होते. या कामात एस-४०० सह भारताची इतर सुरक्षा प्रणाली यशस्वी ठरली होती. मात्र ऑपरेशन सिंदूरमधून भारताच्या सुरक्षा यंत्रणांसाठीही काही धडे मिळाले आहेत. तसेच भविष्यातील संकटांचा विचार करून काही सुधारणा तातडीने कराव्या लागणार आहेत. संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी याबाबत काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत.
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, घडलेल्या घडामोडी आणि झालेली हानी पाहता भारताने पाकिस्तानी सैन्यदलांवर पूर्णपणे वर्चस्व राखले हे जवळपास स्पष्ट झाले आहे. मात्र ऑपरेशन सिंदूरदरम्यान, युद्धाची एक वेगळीच रणनीती दिसून आली. भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात ड्रोनचा वापर करण्यात आला. ही बाब भारतीय सुरक्ष दलांची चिंता वाढवणारी आहे.
भारताकडे सध्या हवाई संरक्षणासाठी एस-४०० ही हवाई संरक्षण प्रणाली आहे. ही प्रणाली जगातील सर्वात अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणालींपैकी एक आहे. त्याशिवाय भारताकडे स्वनिर्मित आकाश ही हवाई सुरक्षा प्रणाली आणि इतर संरक्षण यंत्रणा आहेत. मात्र ही सर्व अस्त्रे ही क्षेपणास्त्र, लढाऊ विमान आणि रॉकेट हल्ल्यांपासून बचाव करण्यास सक्षम आहेत. मात्र ड्रोन हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी भारताकडे सध्यातरी कुठलं सुरक्षा कवच नसल्याचं ऑपरेशन सिंदूरदरम्यान दिसून आलं.
आयडीआरडब्ल्यू डॉट ओरआरजी वेबसाईटमधील एका रिपोर्टनुसार सध्याची आव्हानं पाहता भारताला काऊंटर रॉकेट, आर्टिलरी अँड मोर्टार म्हणजे सी-आरएएम प्रणाली विकसित करण्याची आवश्यकता आहे. या प्रणालीच्या माध्यमातून ड्रोनसारख्या हवाई संकटांना नष्ट करता येऊ शकतं. त्यामुळे देशाच्या सीमावर्ती भागांमधील लष्करी तळांची संरक्षण व्यवस्था अधिक भरभक्कम होईल.
सी-आरएएम म्हणजे काय?
सी-आरएएम ही अमेरिकन फेलेक्स आणि इस्राइली आयरन डोमसारखं एक सुरक्षा कवच आहे. हे सुरक्षा कवच कमी उंचीवरून येणाऱ्या रॉकेट, तोफा, मोर्टार आणि ड्रोनसारख्या घोकादायक वस्तूंना त्वरित पूर्णपणे नष्ट करू शकतं, अशा प्रकारे विकसित करण्यात आलेलं आहे. जगातील अनेक देशांकडे अशा प्रकारची सुरक्षा प्रणाली आहे. हमास आणि हिजबुल्लाहसोबतच्या संघर्षात इस्राइलच्या आयरन डोमने आपली ताकद दाखवून दिलेली आहे.