तेल संकट वाढले, टंचाईने जग बेजार पण भारत झाला उदार, बांगलादेशाला पाठवले ‘इतके’ हजार टन इंधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 12:26 IST2026-03-10T12:22:17+5:302026-03-10T12:26:33+5:30
India Export Fuel To Bangladesh: युद्धामुळे आखाती देशांतील तेल उत्पादन आणि वाहतूक धोक्यात आली असून, त्याचे थेट पडसाद भारतीय अर्थव्यवस्थेवरही पडण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.

तेल संकट वाढले, टंचाईने जग बेजार पण भारत झाला उदार, बांगलादेशाला पाठवले ‘इतके’ हजार टन इंधन
India Export Fuel To Bangladesh: इराणमध्ये नवीन सर्वोच्च नेत्याची निवड आणि सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतींनी गेल्या अनेक वर्षातील उच्चांक गाठला. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत रातोरात ३० टक्क्यांची प्रचंड वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात 'ब्रेंट क्रूड'ने प्रतिबॅरल १२० डॉलर्सचा टप्पा गाठल्याने संपूर्ण जगाचे धाबे दणाणले असून, जगभरातील शेअर बाजार कोसळले आहेत. या युद्धामुळे आखाती देशांतील तेल उत्पादन आणि वाहतूक धोक्यात आली असून, त्याचे थेट पडसाद भारतीय अर्थव्यवस्थेवरही पडून महागाई वाढण्याची भीती आहे. एकीकडे तेल संकट वाढले आहे. टंचाईच्या भीतीने जग दडपणाखाली आहे. भारतावरही याचे परिणाम जाणवत आहेत. असे असले तरी भारताने बांगलादेशला हजारो टन इंधन पोहोचवले आहे.
होर्मूझच्या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक जवळजवळ थांबली आहे, यामुळे १९७० नंतरचे सर्वात गंभीर ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. युद्धाच्या दुसऱ्या आठवड्यात परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. इराणने बहरिनमधील जलशुद्धीकरण केंद्रावर आणि सरकारी तेल शुद्धीकरण प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ले केले. यामुळे तेल कंपनीने आपला पुरवठा थांबवल्याची घोषणा केली आहे. जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी २० टक्के तेल ज्या 'होर्मूझ'च्या सामुद्रधुनीतून वाहून नेले जाते, ती आता युद्धभूमी बनली आहे. इराणच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या भीतीने सौदी अरेबिया, कुवेत, इराक आणि युएईमधून येणारी जहाजे थांबली आहेत.
कराराअंतर्गत डिझेलचा पुरवठा सुरू
भारत आणि बांगलादेशमधील पाइपलाइन कराराअंतर्गत डिझेलचा पुरवठा सुरू झाला आहे. दोन्ही देशांमधील ऊर्जा सहकार्य मजबूत करण्यासाठी हा द्विपक्षीय करार करण्यात आला. ५ हजार टन डिझेलची पहिली खेप बांगलादेशात पोहोचली आहे. बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसी) चे अध्यक्ष मोहम्मद रेझानुर रहमान यांनी याला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, आमचा भारतासोबत करार आहे. त्या करारानुसार, भारत दरवर्षी बांगलादेशला पाइपलाइनद्वारे १८०,००० टन डिझेल पुरवेल. भारतातून नुकतेच आलेले ५,००० टन डिझेल या वार्षिक कराराचा एक भाग आहे.
भारतातून होणार डिझेल पुरवठा बांगलादेशसाठी फायदेशीर
कराराच्या अटींनुसार, बांगलादेशला पहिल्या सहा महिन्यांत किमान ९०,००० टन डिझेल आयात करावे लागेल. भविष्यातील योजना सांगताना बीपीसीचे अध्यक्ष म्हणाले की,५,००० टन डिझेलची पहिली खेप पोहोचली आहे. आम्हाला आशा आहे की, पुढील दोन महिन्यांत आम्ही संपूर्ण सहा महिन्यांसाठी आवश्यक असलेले एकूण डिझेल देशात आणू. भारतातून होणारा हा पाइपलाइन डिझेल पुरवठा बांगलादेशसाठी फायद्याचा आणि वेळ वाचवणारा सौदा ठरणार आहे. यामुळे केवळ वाहतूक खर्च कमी होणार नाही, तर उत्तर बांगलादेशमध्ये डिझेलची उपलब्धता सुलभ होईल.
दरम्यान, हा पाइपलाइन प्रकल्प भारताच्या "नेबरहुड फर्स्ट" धोरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे. हे धोरण शेजारी देशांच्या मूलभूत गरजा आणि विकास प्रयत्नांना भारताचा सक्रिय पाठिंबा दर्शविते. ही मदत अशा वेळी करण्यात आली, जेव्हा मध्य पूर्व युद्धामुळे जागतिक तेल संकटाचा धोका वाढला आहे.