Pinarayi Vijayan : "काँग्रेस भाजपाची 'बी-टीम'..."; केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन राहुल गांधींवर भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 10:32 IST2026-03-22T10:31:16+5:302026-03-22T10:32:11+5:30
Pinarayi Vijayan And Rahul Gandhi : केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी काँग्रेस आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

Pinarayi Vijayan : "काँग्रेस भाजपाची 'बी-टीम'..."; केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन राहुल गांधींवर भडकले
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी काँग्रेस आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी काँग्रेसवरभाजपाची 'बी-टीम' असल्याचा गंभीर आरोपही केला. राहुल गांधी यांनी "केंद्राच्या सर्व तपास यंत्रणांनी देशातील सर्व विरोधी नेत्यांविरुद्ध कारवाई केली आणि त्यांना अटकही केली, मात्र केरळच्या मुख्यमंत्र्यांवर मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही" असं म्हटलं होतं.
राहुल गांधींच्या या विधानाला उत्तर देताना मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले की, "राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष प्रत्यक्षात भाजपाची बी-टीम आहेत. काही लोक स्वतःच्या अनुभवातूनही काही शिकत नाहीत. असे लोक सामान्य नसतात, तर ते एक दुर्मिळ उदाहरण असतात. हे अशा लोकांच्या बाबतीत घडतं ज्यांना सहसा गोष्टी समजून घेण्याची क्षमता नसते आणि राहुल गांधी याच श्रेणीत येतात."
"केजरीवालांना मिळालेली क्लीन चिट राहुल गांधींसाठी मोठा धक्का"
पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले, "राहुल गांधींनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते, परंतु न्यायालयाने त्यांना सर्व आरोपातून मुक्त करत क्लीन चिट दिली. न्यायालयाचा हा निकाल राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का होता. असं असूनही ते पुन्हा तीच चूक करत आहेत. म्हणूनच मी म्हणालो की, ते आपल्या अनुभवातून धडा घेत नाहीत."
"भाजपा-काँग्रेस युती यापूर्वी अनेकदा झाली"
मुख्यमंत्र्यांनी असा दावा केला की, राज्यात यापूर्वी अनेकवेळा काँग्रेस आणि भाजपाची युती पाहायला मिळाली आहे. मात्र आगामी निवडणुकीत काय निकाल लागेल, हे सध्या पूर्णपणे स्पष्ट नाही. हे दोन्ही पक्ष एकाच पद्धतीने एलडीएफ (LDF) ला विरोध करतात आणि त्यांच्यात ताळमेळ असल्याचं दिसून येतं.