न्यायाधीशांनी 'मी परिपूर्ण' मानणे न्यायव्यवस्थेसाठी घातक; सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 07:34 IST2026-02-15T07:33:28+5:302026-02-15T07:34:12+5:30
कॉमनवेल्थ ज्यूडिशियल एज्युकेटर्सच्या ११व्या द्वैवार्षिक बैठकीच्या उद्घाटन समारंभात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी संबंधित वक्तव्य केले.

न्यायाधीशांनी 'मी परिपूर्ण' मानणे न्यायव्यवस्थेसाठी घातक; सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली : न्यायाधीश परिपूर्ण नसल्यामुळे न्यायालयीन नेतृत्व कमकुवत होत नाही. मात्र, जेव्हा न्यायाधीश अपूर्ण असताना परिपूर्ण भासवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा खऱ्या अर्थाने न्यायव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होतो, असे प्रतिपादन सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी केले. न्यायालयीन नेतृत्वाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातही आमूलाग्र बदल करण्याची गरजही व्यक्त केली.
कॉमनवेल्थ ज्यूडिशियल एज्युकेटर्सच्या ११व्या द्वैवार्षिक बैठकीच्या उद्घाटन समारंभात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी संबंधित वक्तव्य केले.
न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली व्यक्ती परिपूर्णच असते हा समज चुकीचा आहे. त्यांच्यातदेखील सुधारणा व आत्मपरीक्षणाची क्षमता असते.
नम्रता ही वैयक्तिक नाही तर व्यावसायिक गरज
सध्याच्या काळात न्याय देणाऱ्या मार्गांनी कायद्याचे अर्थ लावण्याची क्षमतादेखील न्यायाधीशांमध्ये असणे गरजेचे आहे, असे सूर्य कांत म्हणाले. आपल्यासाठी आदरणीय न्यायाधीशांनी स्वत:ला कधीही परिपूर्ण असल्याचे भासवले नाही. नम्रता ही केवळ वैयक्तिक सद्गुण नसून, व्यावसायिक सुरक्षाकवच आहे. जेव्हा समाज बदलतो, नवीन आव्हाने आणि जटिल प्रश्न निर्माण होतात, तेव्हा न्यायाधीशांच्या समजुतीचा खऱ्या अर्थाने कस लागतो. अशा गतिमान परिस्थितीत, न्यायाधीश म्हणून आपली भूमिका केवळ पूर्वग्रहांवर प्रभुत्व मिळवण्याएवढीच मर्यादित नाही, असेही ते म्हणाले.