नवी दिल्ली : हैदराबादेतील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा चकमकीत मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांमार्फत करण्याबाबत सर्वोच्च न्यायालय विचार करीत आहे.
सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्या. एस. अब्दुल नजीर आणि न्या. संजीव खन्ना यांच्या पीठाने सांगितले की, आम्हाला असे वाटते की, सर्वोच्च न्यायालयाच्या दिल्लीत राहणाऱ्या एखाद्या माजी न्यायाधीशांनी या घटनेची चौकशी करावी. या माजी न्यायाधीशांना दिल्लीत राहून काम करावे लागेल. या चकमकीची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्यासाठी दाखल जनहित याचिकांवर गुरुवारी विचार करण्यात येणार आहे.
तेलंगणा सरकारकडून ज्येष्ठ वकील मुकुल रोहटगी आणि वकील कृष्णकुमार सिंह यांनी सांगितले की, चकमकीच्या प्रकरणात निर्देशांचे पालन करण्यात आलेले आहे. पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध स्वतंत्र तपास करण्यासाठी न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत.