'त्याने तीन लग्नं केली, पुरावे नष्ट करून पत्नींना सोडून देतो', सरकारी डॉक्टरवर महिलेचे गंभीर आरोप, DNA तपासणी करण्याची केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:40 IST2026-02-18T13:38:31+5:302026-02-18T13:40:55+5:30
Uttar Pradesh Crime News: माझ्या पतीने आतापर्यंत तीन लग्नं केली असून, तो पुरावे नष्ट करून पत्नींना सोडून देतो असा गंभीर आरोप उत्तर प्रदेशमधील एका महिलेने तिच्या डॉक्टर पतीवर केला असून, त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही दिली आहे.

'त्याने तीन लग्नं केली, पुरावे नष्ट करून पत्नींना सोडून देतो', सरकारी डॉक्टरवर महिलेचे गंभीर आरोप, DNA तपासणी करण्याची केली मागणी
माझ्या पतीने आतापर्यंत तीन लग्नं केली असून, तो पुरावे नष्ट करून पत्नींना सोडून देतो असा गंभीर आरोप उत्तर प्रदेशमधील एका महिलेने तिच्या डॉक्टर पतीवर केला असून, त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही दिली आहे. आरोपी पतीने तिच्याशी लग्न करण्यापूर्वी आणि लग्न केल्यानंतर इतर महिलांशी लग्नं केली. एवढंच नाही तर त्याच्यापासून आपल्याला एक मुलगी झाली आहे. मात्र तो तिला स्वीकारण्यास नकार देत आहे. आता पोलिसांनी या महिलेच्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल करून घेतला असून, डीएनए चाचणीची प्रक्रियाही सुरू केली आहे.
याबाबत पीडित महिलेने सांगितले की, मी झाशीमधील समथर येथील रहिवासी आहे. तसेच सध्या नवाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास आहे. मी २०२० मध्ये बुंदेलखंड विद्यापीठाच्या वसतीगृहात राहत असताना माझी डॉक्टर राजवीर याच्याशी भेट झाली होती. त्यानंतर आमच्यात मैत्री झाली. यादरम्यान, राजवीर याने एकदा मला शितपेयामधून अमली पदार्थ पाजला. त्यामुळे मी बेशुद्ध पडले. त्यानंतर त्याने माझ्यावर बलात्कार करून त्याचा व्हिडीओ तयार केला. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी त्याला विरोध केला. दरम्यान, तू मला आवडतेस आणि मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे, असे राजवीर याने मला सांगितले. या दरम्यान मी गर्भवती राहिले. अखेर आरोपी राजवीर याने १ मे २०२० रोजी माझ्यासोबत लग्न केलं. त्यानंतर डिसेंबर महिन्यात मी एका मुलीला जन्म दिला.
मात्र मुलीचा जन्म झाल्यानंतर राजवीर याच्या वागणुकीत बदल झाला. तो वारंवार घराबाहेर राहू लागला. त्याने माझ्याशी बोलणं कमी केलं. एवढंच नाही तर त्याने माझ्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. कधी कधी तो मला घरात कोंडून बंदूकीचा धाकही दाखवू लागला, अशी तक्रारही पीडित महिलेने केली.
राजवीर याने आणखीही लग्नं केली होती, असा आरोप करताना पीडित महिलेने पुढे सांगितले की, माझा पती राजवीर हा सध्या पुखरायां येथे तैनात आहे. त्याने आधी एका महिलेशी लग्न केलं होतं. त्यानंतर त्याने माझ्याशी विवाह केला. एवढंच नाही तर माझ्यानंतर त्याने भिंड येथील एका महिलेशी लग्न केलं. त्याने एकूण तीन लग्नं केली. तसेच त्याने पहिल्या पत्नीला मारले, असा त्याच्या आईवडिलांचा दावा आहे, असा दावाही पीडित महिलेने यावेळी केला.
दरम्यान, आज मी न्यायासाठी इकडे तिकडे भटकत आहे. तर आरोपी त्याचा माझ्याशी काही संबंध नाही आहे. तसेच आमच्यातील संबंधातून झालेली मुलगीही आपली नसल्याचे सांगत आहे. म्हणून मी माझी मुलगी आणि आरोपीच्या डीएनए चाचणीची मागणी केली आहे. आता या चाचणीमधूनच सारं सत्य समोर येणार आहे, असा विश्वासही या पीडित महिलेने यावेळी व्यक्त केला.