नवी दिल्ली - देशभरात वर्ष 2017 निरोप देऊन नवीन 2018 वर्षाचे अगदी जल्लोषात स्वागत करण्यात आले. जुन्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईसह देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'नववर्षात सर्वांना सुख-समृद्धी, सदृढ आरोग्य लाभो', अशा शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन दिल्या आहेत.
रविवारीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना 'मन की बात' कार्यक्रमातून देशातील नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. 'तरुण पिढीने आणि खास करून १८ ते २५ या वयोगटातील नागरिकांनी लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन, त्यांच्या स्वप्नातील भारत कसा असावा, याचे विचारमंथन करावे आणि तसा नवभारत साकार करण्यासाठी हिरिरीने पुढाकार घ्यावा, असे आवाहनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नूतन वर्षाच्या स्वागतानिमित्त केले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीदेखील नवीन वर्षाच्या देशवासियांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ''सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! वर्ष 2018 देशवासियांना व संपूर्ण जगातील समुदायांच्या जीवनात सुख-समृद्धी, शांती व आनंद लाभत राहो''.असे ट्विट करत राष्ट्रपती कोविंद यांनी देशवासियांनी नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जवानांसोबत नवीन वर्षाचं सेलिब्रेशन केले. उत्तराखंडात चीनच्या सीमेवर तैनात असणा-या आयटीबीपीच्या मुख्य चौक्यांनादेखील भेट दिली. यावेळी राजनाथ सिंह यांनी जवानांचं धैर्य वाढवलं आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबतही संवाद साधला.
उत्तर प्रदेश : वाराणसी येथे नववर्षाच्या पहिल्या दिवशी गंगा मातेची आरती करण्यात आली.