"पाणी खूप थंड होतं, म्हणून..."; इंजिनिअरच्या मृत्यू प्रकरणी वडिलांचा रेस्क्यू टीमवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 11:19 IST2026-01-19T11:18:31+5:302026-01-19T11:19:29+5:30
एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पाण्याने भरलेल्या खड्ड्यात कार कोसळून २७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाला.

फोटो - ndtv.in
नोएडा येथील सेक्टर १५० मध्ये एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पाण्याने भरलेल्या खड्ड्यात कार कोसळून २७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाला. या अपघाताने नोएडा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. या घटनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी 'आज तक'ने युवराजचे वडील राज कुमार मेहता यांच्याशी संवाद साधला.
युवराजच्या वडिलांनी नोएडा प्रशासनावर खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांनी सांगितलं की, तीन विभागांचे सुमारे ८० लोक मिळूनही त्यांच्या मुलाला वाचवू शकले नाहीत. फायर डिपार्टमेंट, नोएडा पोलीस आणि SDRF ची टीम घटनास्थळी हजर होती. मात्र "पाणी खूप थंड आहे आणि पाण्यात लोखंडी सळ्या असू शकतात" असं कारण देत या विभागांचे कर्मचारी पाण्यात उतरलेच नाहीत.
"कार पाण्यात बुडाली"
वडिलांनी पुढे सांगितले की, "माझा मुलगा कारच्या टपावर उभा राहून दोन तास स्वतःला वाचवण्यासाठी मदतीची याचना करत होता. पण कोणीही पुढे आलं नाही, अखेर कार पाण्यात बुडाली आणि त्यात युवराजचा अंत झाला." स्थानिक रहिवाशांच्या मते, या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. तरीही नोएडा प्राधिकरणाने या परिसरात बॅरिकेडिंग केलं नव्हतं. जर रस्ता बंद केला असता किंवा योग्य सुरक्षा असती, तर हा अपघात टाळता आला असता.
हृदयद्रावक! "मी पाण्यात पडलो, मला वाचवा..."; मृत्यूशी झुंज देणाऱ्या लेकाचा वडिलांना शेवटचा कॉल
प्रशासनाकडून कारवाई
या प्रकरणानंतर नोएडा प्राधिकरणाने एका ज्युनियर इंजिनिअरला सेवेतून काढून टाकलं आहे, तर वाहतूक विभागाच्या इतर जबाबदार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच संबंधित 'लोटस' डेव्हलपरच्या बांधकामाबाबत सविस्तर अहवाल मागवण्यात आला असून सुरक्षेचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पाण्यात कोसळली कार
टाटा युरेका पार्क सोसायटीत राहणारे युवराज मेहता शनिवारी रात्री गुरुग्राममधील ऑफिसवरून घरी परतत होता. दाट धुक्यामुळे सेक्टर १५० मध्ये एका इमारतीच्या बेसमेंटसाठी खोदलेल्या २० फूट खोल पाण्यात त्याची कार कोसळली. एका प्रत्यक्षदर्शी डिलिव्हरी एजंटनेही असा दावा केला की, जर रेस्क्यू ऑपरेशन वेगाने राबवले असतं, तर युवराजचा जीव वाचला असता. दरम्यान, पोलिसांनी बचाव कार्यात हलगर्जीपणा केल्याचा आरोप फेटाळला असून दोन रिअल इस्टेट डेव्हलपर्सवर गुन्हा दाखल केला आहे.