देवास हादरलं! फटाका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, १५ जणांच्या मृत्यूची भीती; रस्त्यावर रक्ताचा सडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 15:04 IST2026-05-14T15:03:47+5:302026-05-14T15:04:37+5:30
देवासमधील फटाका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट होऊन १५ जणांच्या मृत्यूची भीती व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शोक व्यक्त करत ४ लाखांची मदत जाहीर केली आहे.

देवास हादरलं! फटाका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, १५ जणांच्या मृत्यूची भीती; रस्त्यावर रक्ताचा सडा
मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात एका फटाका फॅक्टरीमध्ये झालेल्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला आहे. टोंककला येथील एबी रोडवर असलेल्या या फॅक्टरीमध्ये झालेला धमाका इतका भीषण होता की, परिसरातील घरांच्या भिंतींनाही तडे गेले. या अपघातात १५ हून अधिक मजुरांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असून, रस्त्यावर मानवी देहाचे तुकडे विखुरलेले पाहायला मिळाले. या घटनेवर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
स्थानिक नागरिकांनी फॅक्टरी मालकावर आणि प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. फॅक्टरीमध्ये कोणतीही सुरक्षा मानके न पाळता उघड्यावर मोठ्या प्रमाणात दारूगोळा साठवून फटाके बनवण्याचे काम सुरू होते, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यानेच आज हा भीषण नरसंहार घडल्याचा संताप व्यक्त होत आहे.
राजकीय वरदहस्त आणि लोकांचा रोष
फॅक्टरी मालक अनिल मालवीय याला राजकीय संरक्षण लाभले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या फॅक्टरीचे संबंध स्थानिक लोकप्रतिनिधींशी असल्याच्या चर्चेमुळे गावात तणावाचे वातावरण आहे. स्फोटानंतर घटनास्थळी उघड्यावर पडलेला दारूगोळा पाहून लोकांचा संताप अनावर झाला. पोलिसांनी आणि प्रशासनाने वेळीच दखल घेतली असती, तर हे निष्पाप जीव वाचले असते, अशी भावना व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिले चौकशीचे आदेश
या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री मोहन यादव यांनी 'एक्स'वरून शोक व्यक्त केला. "देवासमधील फटाका फॅक्टरीतील स्फोटाची बातमी हृदयद्रावक आहे. मी उपमुख्यमंत्री जगदीश देवडा आणि गृह सचिवांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत," असे त्यांनी नमूद केले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मृतांच्या कुटुंबीयांना मध्य प्रदेश सरकारकडून प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. जखमींवर सरकारी खर्चाने मोफत उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.