गंगोत्री ते गंगासागरपर्यंत कमळच; सूड नव्हे बदलासाठी काम करा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 05:53 IST2026-05-05T05:53:18+5:302026-05-05T05:53:51+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन; मिळालेले यश हे अनेक वर्षांच्या साधनेचे फलित; मी जनतेसमोर नतमस्तक होत आहे; किंगमेकर ते सत्तेबाहेर असा डाव्या पक्षांचा प्रवास

गंगोत्री ते गंगासागरपर्यंत कमळच; सूड नव्हे बदलासाठी काम करा!
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील भाजपच्या ऐतिहासिक विजयामुळे आता गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत कमळ फुलले आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या गंगा किनाऱ्यावरील राज्यांमध्ये भाजप-एनडीएची सरकारे आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
पश्चिम बंगाल, पुद्दुच्चेरी, आसाम येथे भाजपला विजय मिळाला आहे. विधानसभा निवडणुकांतील यशाबद्दल दिल्लीतील भाजप मुख्यालयात जल्लोष सुरू होता. त्यावेळी एका कार्यक्रमात ते म्हणाले की, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांत भाजपला मिळालेले यश हे अनेक वर्षांच्या साधनेचे फलित आहे. त्याचा आनंद देशभरातील भाजप कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. यापुढे सर्व पक्षांनी सूडासाठी नव्हे तर बदल घडविण्यासाठी काम करावे. तसेच राज्याचे भविष्य घडविण्यास प्राधान्य द्यावे. मी पश्चिम बंगाल, आसाम, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि केरळमधील जनतेसमोर नतमस्तक होत आहे असेही त्यांनी सांगितले.
दोन दिग्गज मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ल्यातच पराभव
कोलकाता/चेन्नई : आज जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांमध्ये पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तमिळनाडूमध्ये एम. के. स्टॅलिन या दोन दिग्गज मुख्यमंत्र्यांना आपापल्या बालेकिल्ल्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.
सुवेंदु अधिकारींनी पुन्हा 'दीदीं'चा केला पराभव
ममता बॅनर्जी यांना भवानीपूर या त्यांच्या हक्काच्या मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला. भाजपचे उमेदवार सुवेंदु अधिकारी यांनी बॅनर्जी यांचा १५,१०५ मतांच्या फरकाने पराभव केला. अधिकारी यांना ७३,९१७ मते तर बॅनर्जींना ५८,८१२ मते मिळाली.
५० वर्षांत प्रथमच ‘डावे’ सर्व राज्यांतून सत्तेबाहेर
५० वर्षांनंतर पहिल्यांदाच डावे पक्ष सर्व राज्यांतून सत्तेबाहेर गेले. १९७७ मध्ये पश्चिम बंगालमध्ये डाव्या आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते. तेव्हापासून आजपर्यंत देशातील किमान एका तरी राज्यात डाव्यांची सत्ता कायम होती. मात्र, ही साखळी तुटली आहे. २००४ मध्ये ६१ खासदारांसह किंगमेकर असलेले डावे पक्ष आता एकाही राज्यात सत्तेत नाहीत.
‘इंडिया’चे काय होणार? राहुल गांधींना संधी
निवडणुकांचे निकाल ‘इंडिया’ आघाडीसाठी राजकीय वास्तवाचा कठोर धडा ठरले. काँग्रेससमोरील अंतर्गत आव्हाने काही प्रमाणात कमी झाल्याने राहुल गांधींना संधी निर्माण झाली आहे. टीएमसीच्या पराभवामुळे ‘इंडिया’ आघाडीत काँग्रेसचे स्थान तुलनेने अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.