नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अजमेर येथे होणाऱ्या सभेसाठी निवडणूक आयोगाने आपल्या पत्रकार परिषदेची वेळ बदलल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसने केला आहे. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र या पत्रकार परिषदेच्या वेळात ऐनवेळी बदल करून ही पत्रकार परिषद दुपारी 3.30 वाजता होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. " या तीन बाबींकडे सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी आज दुपारी 12.30 वाजता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मात्र दुपारी 1 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजमेर येथे सभा आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने आपल्या पत्रकार परिषदेच्या वेळात अचानक बदल केला आहे." निवडणूक आयोग खरंच स्वायत्त आहे? असा सवाल सुरजेवाला यांनी या ट्विट्च्या माध्यमातून केला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित केली आहे.