वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 13:09 IST2026-04-23T13:07:41+5:302026-04-23T13:09:00+5:30
Uttar Pradesh Stray Dog Attack: लग्नसोहळा उत्साहात पार पडल्यानंतर वधूच्या पाठवणीचा कार्यक्रम सुरू असताना एका पिसाळलेल्या कुत्र्याने लग्नमंडपात घुसून वऱ्हाड्यांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बदायूं जिल्ह्यात घडली आहे.

वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ
लग्नसोहळा उत्साहात पार पडल्यानंतर वधूच्या पाठवणीचा कार्यक्रम सुरू असताना एका पिसाळलेल्या कुत्र्याने लग्नमंडपात घुसून वऱ्हाड्यांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बदायूं जिल्ह्यात घडली आहे. सोमवारी सकाळी घडलेल्या या घटनेत ६० हून अधिक वऱ्हाडी जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे लग्नमंडपात एकच गोंधळ उडाला. तसेच लहान मुले आणि महिला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले, त्यामुळे अडखळून धडपडून जखमी झाले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी सुमारे १० वाजता एक बेवारस कुत्रा हॉलमध्ये घुसला. तसेच त्याने तिथे लग्नासाठी उपस्थित असलेल्या लोकांचा एकेक करून चावा घेण्यास सुरुवात केली. कुत्र्याने अचानक केलेल्या हल्ल्यामुळे मंडपात एकच गोंधळ उडाला. तसेच लग्नातील वऱ्हाडी मंडळी जीव वाचवण्यासाठी वाट दिसेल तिथे पळू लागली. त्यानंतर हा कुत्रा लग्नमंडपातून बाहेर पडला आणि वाटेत दिसेल त्याचा चावा घेऊ लागला. कुत्र्याच्या चाव्यामुळे जखमी झालेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. एवढंच नाही तर या कुत्र्याने पुढे गावातील काही पाळीव प्राण्यांचाही चावा घेतला.
या घटनेमध्ये जखमी झालेल्या ६० जणांना प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीजविरोधी लस देण्यात आली. मात्र कुत्र्याने केलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण आहे. तसेच श्वान दंशाच्या या घटनेवरून स्थानिकांनी नगर पालिका प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. पालिका प्रशासन दर महिन्याला कुत्रे पकडण्यासाठी लाखो रुपये खर्च करते. मात्र जेव्हा घटना घडली तेव्हा तिथे कुणीही कर्मचारी आला नाही. तसेच हा पिसाळलेला भटका कुत्रा मोकाट फिरत असून, त्यामुळे संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.