“तिरुपती मंदिरातून राम मंदिराला १ लाख भेसळयुक्त लाडू पाठवण्यात आले”; कुणी केला मोठा दावा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 16:54 IST2026-02-09T16:48:28+5:302026-02-09T16:54:17+5:30
Ram Mandir Ayodhya: राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले, तेव्हा तिरुपति देवस्थानने एक लाख लाडू अयोध्येत पाठवले होते, ते भेसळयुक्त असल्याचा दावा करण्यात आला आहे.

“तिरुपती मंदिरातून राम मंदिराला १ लाख भेसळयुक्त लाडू पाठवण्यात आले”; कुणी केला मोठा दावा?
Ram Mandir Ayodhya: अयोध्येतील राम मंदिराला आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतासह जगभरातून कोट्यवधि भाविक रामचरणी नतमस्तक झाले. अयोध्येत येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रामललाचे दर्शन घेण्याची आस आजही भाविकांमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच राम मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना करण्यात आली, तेव्हा तिरुमला तिरुपति देवस्थानांकडून एक लाख भेसळयुक्त लाडू पाठवले गेले, असा मोठा दावा करण्यात आला आहे.
आंध्र प्रदेशात तिरुपती लाडूंच्या भेसळीचा मुद्दा अधिकच तापला आहे. माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात राम मंदिराच्या लोकार्पणावेळी तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) येथून सुमारे १ लाख भेसळयुक्त लाडू अयोध्येत पाठवण्यात आल्याचा आरोप विद्यमान उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी केला आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे की, जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारने लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी बाथरूम साफ करणारे रसायन मिसळले होते. ही भगवान वेंकटेश्वरांच्या श्रद्धेशी तडजोड असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एका पवित्र प्रसंगाला अपवित्र केले
संपूर्ण देश राम मंदिराच्या लोकार्पणाचा आनंद सोहळा साजरा करत असताना जगन मोहन रेड्डी सरकारने तिरुमला तिरुपति देवस्थानातून अयोध्येत जवळजवळ एक लाख भेसळयुक्त लाडू पाठवले. त्यांनी याला एका पवित्र प्रसंगाला अपवित्र केले. लाडूंमध्ये शुद्ध तूप वापरले गेले नव्हते. त्याऐवजी, वनस्पती तूप किंवा पाम तेल यांसारखे स्वस्त तेल वापरले गेले, असा दावा पवन कल्याण यांनी केला.
दरम्यान, पवन कल्याण म्हणाले की, ही केवळ भेसळ नाही तर शुद्ध तुपाच्या जागी स्वस्त घटक आणले जात आहेत. त्यांनी सांगितले की, यातील लाखो भेसळयुक्त लाडू बनवून वाटण्यात आले होते. त्यापैकी १,००,००० लाडू राम मंदिरात पाठवण्यात आले होते. एवढ्या मोठ्या धार्मिक प्रसंगीही भेसळयुक्त प्रसाद पाठवणे चुकीचे आहे, असेही त्यांनी सांगितले.