नवी दिल्लीःदिल्लीतल्या हिंसाचारावर भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या अकाली दलानं मोठं विधान केलं आहे. अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि लोकशाहीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. दिल्लीत होत असलेला हिंसाचार ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. शांततेत जगणे खूप महत्त्वाचे आहे. आमच्या देशाच्या संविधानात तीन गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. ज्यात धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि लोकशाहीचा समावेश आहे. इथे धर्मनिरपेक्षता किंवा समाजवाद नाही. श्रीमंत श्रीमंत होत चालला आहे, तर गरीब आणखी गरीब होत गेला आहे. लोकशाहीसुद्धा फक्त दोन स्तरावरच शिल्लक राहिली आहे. एक लोकसभा निवडणूक आणि दुसरी विधानसभा निवडणूक, बाकी काहीही नाही.
Delhi Violence : ताहिर हुसैनविरोधात गुन्हा दाखल, कधीही होऊ शकते अटक
तत्पूर्वी माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचा मुलगा आणि अकाली दलाचे नेते नरेश गुजराल यांनी पत्र लिहून दिल्ली पोलिसांच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना पत्र लिहिलं. प्रत्येक वेळी अल्पसंख्याकांना हिंसेत लक्ष्य करणं दुर्दैवी आहे. नरेश गुजराल म्हणाले, 1984ची परिस्थिती मला पुन्हा पाहायची नाही. मला दिल्लीकर असण्यावर गर्व आहे. गेल्या वेळी शीख होते अन् यावेळी मुसलमान आहेत. प्रत्येक वेळी अल्पसंख्याक समाजावरच हल्ले चढवले जातात. 1984मध्ये शीखविरोधी दंगली झाल्या होत्या. त्यावेळी हजारो लोकांना जिवानिशी जावं लागलं होतं.