"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 14:27 IST2025-05-21T14:27:17+5:302025-05-21T14:27:53+5:30
जखमींना घेऊन जाण्यासाठी दीड तासाने प्रशासन तिथे पोहचते. जे हत्या करून पळाले ते दहशतवादी कुठे गेले असा सवालही यशवंत सिन्हा यांनी विचारला.

"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
नवी दिल्ली - पहलगाम हल्ल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा फायदा भाजपाला उचलायचा आहे. बिहार निवडणुका येत आहेत. पुलवामा झाले तेव्हाही निवडणूक होती. पुरीमध्ये हल्ला झाला त्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राईकचा फायदा भाजपाने घेतला. पुलवामा हल्ल्यात शहीदांच्या नावे मोदींनी मते मागितली. त्यामुळे जे काही झाले ते बिहार निवडणुकीसाठी झाल्याचे मला वाटते. भाजपाची तिरंगा यात्राही क्रेडिट घेण्यासाठीच सुरू असल्याचं सांगत माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी भाजपावर घणाघात केला.
राष्ट्रपती निवडणूक लढलेले यशवंत सिन्हा यांनी कपिल सिब्बल यांच्यासोबतच्या पॉडकास्टमध्ये म्हटलं की, भाजपाचे लोक आता हे सांगत आहेत, नरेंद्र मोदींनी कमाल केली तर पहलगाममध्ये झालेल्या २६ नागरिकांच्या हत्येला जबाबदार कोण हे का विचारले जात नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटले. त्यावर आतापर्यंत पुलवामाचा खुलासा झाला नाही. त्याप्रकारे पहलगामवरही खुलासा होणार नाही. अखेर पहलगाममध्ये एकही जवान किंवा पोलीस का नव्हता. जे लोक हत्या करून पळाले त्यांच्याबाबत काहीच माहिती का मिळू शकत नाही. ते कुठे गेलेत असा सवाल यशवंत सिन्हा यांनी विचारला.
तसेच पाकिस्तानसोबत केवळ पीओके आणि दहशतवादावर चर्चा होईल असं भारत सरकार म्हणते, असे असेल तर पाकिस्तानसोबत चर्चाच होऊ शकत नाही असं कपिल सिब्बल यांनी सांगितले. सीजफायरच्या निर्णयावरही यशवंत सिन्हा यांनी प्रश्न उपस्थित केला. डिजीएमओमध्ये संवाद झाला. पाकिस्तानकडून सीजफायरची विनंती करण्यात आली मग घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून का झाली? ट्रम्प यांच्या घोषणेपूर्वी भारताने काहीच का सांगितले नाही. अद्यापही नरेंद्र मोदी यावर गप्प आहेत असं सिन्हा म्हणाले.
दरम्यान, आम्ही बऱ्याचदा काश्मीरात गेलो, तिथे देवेंद्र सिंह नावाचा एक डिएसपी होता, एअरपोर्ट सिक्युरिटी आणि अॅन्टी टेरिजन्म स्क्वॉडचा डिएसपी होता. तो एकेदिवशी दहशतवाद्यांसोबत पकडला गेला. ज्यांनी त्याला पकडले ते सीआरपीएफचे पोलीस होते. हा सरकारचा खास माणूस आहे हे त्यांना माहिती नव्हते. दहशतवाद्यांसोबत तो चालला होता त्याला पकडले गेले. परंतु तो कुठे गायब झाला हे आजतागायत कुणाला माहिती नाही. त्याच्यावर खटला चालला, निलंबित केले, पुढे काय झाले त्याचे उत्तर नाही. पहलगाम हल्ल्यावेळी २ हजार पर्यटक तिथे असताना एकही जवान नाही. जखमींना घेऊन जाण्यासाठी दीड तासाने प्रशासन तिथे पोहचते. जे हत्या करून पळाले ते दहशतवादी कुठे गेले असा सवालही यशवंत सिन्हा यांनी विचारला.