"अर्धवट वैद्यकीय शिक्षण घेऊन उपचार करण्याची वेळ आता येणार नाही; अमित शाह यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 17:20 IST2026-03-15T17:19:52+5:302026-03-15T17:20:45+5:30
Amit Shah: "वैद्यकीय शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांनी रशिया किंवा युक्रेनसारख्या देशांत जाण्याची गरज पडू नये, यासाठी भारतातच जागतिक दर्जाच्या सुविधा ...

"अर्धवट वैद्यकीय शिक्षण घेऊन उपचार करण्याची वेळ आता येणार नाही; अमित शाह यांचे आश्वासन
Amit Shah: "वैद्यकीय शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांनी रशिया किंवा युक्रेनसारख्या देशांत जाण्याची गरज पडू नये, यासाठी भारतातच जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे," असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज आसाममध्ये केले. शाह यांनी आसाम दौऱ्यात २,०९२ कोटी रुपयांच्या आरोग्य प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करत राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला चालना दिली आहे.
२,०९२ कोटींच्या प्रकल्पांची भेट
अमित शाह यांनी रविवारी गुवाहाटी येथे एका भव्य कार्यक्रमात एकूण ८ महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा केली. ६७५ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या प्राग्ज्योतिषपुर मेडिकल कॉलेज या भव्य मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे शाह यांनी उद्घाटन केले. गोलाघाट आणि तिनसुकिया येथे प्रत्येकी १३५ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या दोन नवीन कॅन्सर केंद्रांचे ऑनलाइन लोकार्पण करण्यात आले. दीफू (२२० कोटी), जोरहाट (३१० कोटी) आणि बारपेटा (२८४ कोटी) येथील सुपर-स्पेशालिटी रुग्णालयांची पायाभरणी करण्यात आली. गुवाहाटीमध्ये २१८ कोटींचे 'स्वास्थ्य भवन' आणि अभयपुरी येथे ११५ कोटींच्या जिल्हा रुग्णालयाची पायाभरणीही पार पडली.
"भारतातच वैद्यकीय शिक्षणाच्या चांगल्या सोयी असाव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात जावे लागणार नाही आणि अर्धवट शिक्षण घेऊन उपचार करण्याची वेळ येणार नाही," असे अमित शाह यांनी स्पष्ट केले.
"न जन्मलेल्या मुलांच्या नावावर भ्रष्टाचार"; काँग्रेसवर निशाणा
यावेळी बोलताना शाह यांनी काँग्रेसच्या मागील १५ वर्षांच्या राजवटीवर कडाडून टीका केली. "काँग्रेसच्या काळात दरवर्षी ९ लाख 'बोगस' मुलांच्या उपचारांच्या नावाखाली १५० कोटी रुपये लाटले जात होते. जी मुले जन्मलीच नव्हती, त्यांच्या नावावर पैसे काढले गेले. अंगणवाड्यांच्या नावाखालीही मोठा भ्रष्टाचार झाला," असेही अमित शाह म्हणाले.
भाजपच्या काळात आसामचा आरोग्य बजेट ४,००० कोटींवरून ९,००० कोटी रुपयांपर्यंत वाढल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, २०१६ मध्ये आसाममध्ये फक्त ६ मेडिकल कॉलेजेस होती, ती आता १४ झाली असून लवकरच हा आकडा २४ वर पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राहुल गांधींवर टीका
दिल्लीतील एआय समिट दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या निदर्शनांचा संदर्भ देत शाह यांनी राहुल गांधींना टोला लगावला. "मोदींचा विरोध करताना तुम्ही देशाच्या प्रतिमेला धक्का लावत आहात. देशाबाहेरून लोक आलेले असताना असे आंदोलन करणे हे देशाचा अपमान करण्यासारखे आहे," असे ते म्हणाले.