पेठ -चार महिने उलटूनही पाऊस ओसरायला तयार नसल्याने तालुक्यातील भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून आदिवासी बळीराजा पुरता मेटाकुटीला आला आहे. डोंगराळ जमीन, सिंचनाचा अभाव यामूळे तालुक्यातील बहुतांश शेतकरी खरीप हंगामावर अवलंबून असतात. भात हे एकमेव आर्थिक उत्पन्नाचे साधन असतांना या वर्षी काहीशा उशीराने सुरू झालेल्या पावसाने तब्बल एक महिना आपला मुक्काम वाढवल्याने परिपक्व झालेल्या भाताची पिके पाण्यात सापडली आहेत. मध्यंतरी काही दिवस उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी भाताची कापणी सुरू केली होती. मात्र कापून ठेवलेले भातही पावसाच्या पाण्यात भिजल्याने आदिवासी शेतकरी मेटाकूटीस आला आहे. भाताबरोबर खुरसाणी, ऊडीद, मूग, भुईमुंग या पिकांनाही अवकाळी पावसाचा तडाका बसल्याने शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेती पिकांची तात्काळ पाहणी करून शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावेत अशी मागणी करण्यात आली असून जिल्हा प्रशासनास पाठवण्यात आलेल्या पिहल्या टप्प्यातील नुकसान अहवालात पेठ तालुका निरंक दाखवण्यात आल्याने शेतकर्यांनी नाराजी व्यक्त करीत नुकसानग्रस्त भागाचे फेरपंचनामे करून अहवाल सादर करण्याची मागणी केली आहे.
पेठमध्ये भातासह, खुरसणी पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 1:15 PM