पंचवटी पोलिसांनी जनतेला बनविले 'एप्रिल फूल'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 03:08 PM2019-03-27T15:08:50+5:302019-03-27T15:09:56+5:30
सोमवारी 'जनता दरबार' भरणार म्हणून त्यांनाही बोलविले गेले. ते वेळेत हजर झाले; मात्र रंगपंचमीचा बंदोबस्त असल्याने जनता दरबार रद्द झाल्याची घोषणा पोलीस ठाण्यातून केली गेली.
![Panchavati police created 'April Fool' | पंचवटी पोलिसांनी जनतेला बनविले 'एप्रिल फूल' Panchavati police created 'April Fool' | पंचवटी पोलिसांनी जनतेला बनविले 'एप्रिल फूल'](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/panchvati_201903212577.jpg)
पंचवटी पोलिसांनी जनतेला बनविले 'एप्रिल फूल'
संदीप झिरवाळ, पंचवटी : नांगरे-पाटील साहेबांच्या उपस्थितीत जनता दरबार भरणार...वेळ ठरली सोमवारी (दि.२५) सकाळी अकरा वाजेची...शांतता समिती सदस्यांना निमंत्रण धाडले गेले. निमंत्रणाला मान देऊन (नेहमीप्रमाणे) 'जनता' पोलीस ठाण्यात हजर झाली अन् पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटीलदेखील उपस्थित राहिले; मात्र अचानक पंचवटी पोलिसांना 'रंगपंचमी'चा साक्षात्कार झाला अन् बंदोबस्ताचे कारण पुढे करून 'जनता' दरबाराविनाच माघारी पाठविली गेली. परिणामी पंचवटी पोलिसांनी एप्रिल आरंभापुर्वीच 'एप्रिल फूल' केल्याची चर्चा रंगली.
नव्याने पोलीस आयुक्तपदाची सुत्रे घेतल्यानंतर पहिलीच भेट पंचवटी पोलीस ठाण्याला देणारे नांगरे-पाटील यांना त्या पहिल्या भेटीतच फारसा काही चांगला अनुभव आला नाही. त्यानंतर सोमवारी 'जनता दरबार' भरणार म्हणून त्यांनाही बोलविले गेले. ते वेळेत हजर झाले; मात्र रंगपंचमीचा बंदोबस्त असल्याने जनता दरबार रद्द झाल्याची घोषणा पोलीस ठाण्यातून केली गेली. नांगरे-पाटील यांनी पोलीस ठाण्यातील काही अधिकाऱ्यांसोबत मोजका वेळ चर्चा करत 'सुचना' केली आणि पोलीस ठाणे आपल्या खास शैलीत सोडले.
मागील खूप दिवसानंतर 'जनता दरबार'चे निमंत्रण मिळाल्यामुळे नागरिक रंगपंचमी विसरून पोलीस ठाण्यात एकत्र आले. सुमारे तासभर नागरिकांना ताटकळत ठेवल्यानंतर जनता दरबार रद्द झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दरबारासाठी आलेल्या जनतेच्या समस्यांचे निराकरण होणे तर लांबच मात्र त्यांच्या पदरी घोर निराशा आली. यापुढे पंचवटी पोलिसांच्या दरबाराला 'जनता' कसा प्रतिसाद देते हे बघण्यासारखे असेल.