वाघेश्वरी चौफुली रस्ता काम अर्धवट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 11:53 AM2020-02-18T11:53:28+5:302020-02-18T11:53:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील वाघेश्वरी चौफुली ते भोणे फाटा दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नवीन रस्ता तयार करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील वाघेश्वरी चौफुली ते भोणे फाटा दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नवीन रस्ता तयार करण्यात आला आहे. परंतु या रस्त्याच्या सुरुवातीला व रस्ता संपल्यावर दोन्ही बाजूला काम अपूर्ण असून तेथे मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले आहेत. या खड्डयांमध्ये रोज अपघात होत आहेत. वाहन चालकांना असह्य त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, गांधीगिरी करीत या ठिकाणी जयहिंद फाऊंडेशनने खड्डयात फुले वाहून लक्ष वेधले. याबाबत जयहिंद फाऊंडेशनने आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हा रस्ता एकुण ३८० मीटर आहे. त्यापैकी २० ते ३० मीटरचे बांधकाम अपूर्ण आहे. दरवर्षी रस्त्याची होणारी दुरवस्था लक्षात घेऊन ३८० मीटर लांबी व १२ मीटर रुंदी असा रस्ता मंजूर करण्यात आला. यासाठी दोन कोटी रुपयांचे अंदाजपत्रक देखील मंजूर करण्यात आले. त्यापैकी रस्ते कामावर एक कोटी ४० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. तरीदेखील जर अपघात घडत असतील आणि सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात येणार असेल तर एवढा मोठा निधी खर्च झाल्याचा उपयोग काय? हा भाग नेहमी रहदारीचा असतो या रस्त्यावरून हजारो वाहने ये-जा करीत असतात. परंतु या प्रवाशांना रस्ता बांधकाम झाल्यानंतर देखील समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वाघेश्वरी चौफुली कडील भाग खड्ड्यांनी व्यापलेला असून त्यानंतरचा रस्त्याच्या शेवटचा भाग मुख्य रस्त्यापासून एक फूट उंचीवर आहे. हा अत्यंत धोकादायक आहे. एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा व्हावा यासाठी बांधकाम करताना कोणता पर्याय वापरण्यात आला आहे हा देखील संशोधनाचा भाग असून यावर देखील योग्य उपाय शोधणे आवश्यक आहे.
तातडीने कामास सुरुवात करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा जयहिंद फाउंडेशन तर्फे दिग्विजय राजपूत, भूषण राजपूत, अक्षय कोकणी, फारुख, मोईन शेख व कार्यकर्त्यांनी दिला आहे.
या ठिकाणी खड्डयांचे प्रमाण वाढल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती मलमट्टी करून डांबर व खडी टाकली. यामुळे सोय होण्याऐवजी गैरसोय झाली. खडींमुळे वाहनांचे टायर पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय दुचाकी वाहनांचा तोल जावून पडण्याचे प्रकार देखील वाढले आहेत. ही बाब लक्षात घेता या रस्त्याची कायमस्वरूपी दुरूस्ती करून अपुर्ण राहिलेले काम पुर्ण करावे अशी मागणी करण्यात येत आहे. त्याचसाठी हे आंदोलन करण्यात आले.