दहापेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा होणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 01:01 PM2020-02-14T13:01:50+5:302020-02-14T13:01:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : जिल्हा परिषदेच्या दहापेक्षा कमी पटसंख्या असणाºया शाळांमधील विद्यार्थी परिसरातील शासकीय आश्रमशाळेत समायोजित करा, असे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : जिल्हा परिषदेच्या दहापेक्षा कमी पटसंख्या असणाºया शाळांमधील विद्यार्थी परिसरातील शासकीय आश्रमशाळेत समायोजित करा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी नुकत्याच झालेल्या शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडणार आहेत.
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची कमी होत जाणारी पटसंख्या हा नेमहीच चिंतेचा विषय राहिला आहे. पालकांच्या इंग्लिश मिडीयम शाळांना असणाºया प्राधान्यामुळे जिल्ह्यात अनेक जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या रोडावली आहे. या व अन्य अनेक कारणांमुळे जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या दहापेक्षा कमी झाली आहे. अशा शाळांच्या बाबतीत ११ फेब्रुवारी रोजी झालेल्या शिक्षण विभागाच्या आढावा व मार्गदर्शन सभेत चर्चा करण्यात आली. या बैठकीत १० पेक्षा कमी पटसंख्या असणाºया शाळांमधील विद्यार्थी व पालकांचे समुपदेशन करून विद्यार्थी जवळच्या आश्रमशाळेत व मुली असल्यास त्यांना तालुक्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात प्रवेशित करण्यासंबंधीचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी शिक्षण विभागाला दिले.
त्यानुसार प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाºयांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांना त्यासंबंधी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अशा शाळांमधील विद्यार्थ्यांचे अन्य शाळेत समायोजन करताना पालकांना विश्वासात घेऊन त्यांचे समुपदेशन करण्यात यावे, असे प्राथमिक शिक्षणाधिकाºयांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. पालकांचे समुपदेशन करण्याची जबाबदारी ज्या केंद्रातील अशा शाळा असतील त्या केंद्राचे शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे.
पालकांनी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना समायोजित करण्यासाठी सहमत व्हावे यासाठी मोठ्या पटसंख्या असलेल्या आश्रमशाळांमध्ये शासनामार्फत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया सुविधा, सेंट्रल किचनमार्फत मिळणारे जेवण, मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके, अध्ययन-अध्यापन विषयक अत्याधुनिक सुविधा तसेच आरोग्यविषयक उच्च दर्जाच्या अटल वाहिनीसारख्या सेवा, भव्य क्रीडांगण व त्यातील खेळाच्या सुविधा याशिवाय आश्रमशाळेत उपलब्ध असलेल्या अन्य सोयीसुविधांबाबत पालकांना व विद्यार्थ्यांना सविस्तरपणे माहिती समजावून देण्यात येणार आहे. शिवाय पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या व्यक्तीश: भेट देऊन त्यांचे उद्बोधनदेखील केले जाणार आहे. यासाठी संबंधित गटशिक्षणाधिकारी यांनी स्वत: पुढाकार घेऊन गावातील सरपंच, पोलीस पाटील व प्रतिष्ठीत नागरिक यांच्या सहभागाने पालक व विद्यार्थी यांचे प्रबोधन करण्यात यावे असे, प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून सूचित करण्यात आले आहे.
दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना जवळच्या आश्रमशाळेत प्रवेशित करताना प्रथम प्राधान्य हे शासकीय आश्रमशाळांना देण्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, पालकांचे व विद्यार्थ्यांचे उद्बोधन करून किती विद्यार्थी कमी पटाच्या शाळेतून मोठ्या शाळेत दाखल झाले आहेत याविषयीचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्यासमक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी कार्यालयात विनाविलंब सादर करावा करावा लागणार आहे. त्यामुळे दहापेक्षा कमी पटसंख्या असणाºया शाळांमधील विद्यार्थी अन्य शाळेत समायोजित करण्याची कार्यवाही शिक्षण विभागाला युद्धपातळीवर करावी लागणार आहे. पालकांचे व विद्यार्थ्यांचे समुपदेशन करून त्यांना अन्य शाळेत समायोजित करण्यासाठी सहमत करण्याचे कडवे आव्हान शिक्षण यंत्रणेपुढे असणार आहे. या सर्व प्रक्रियेला पालक व सामाजिक संघटना कसा प्रतिसाद देणार यावर याबाबत शिक्षण क्षेत्रात तर्कवितर्क लावले जात आहेत.