टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 14:16 IST2026-05-01T14:15:02+5:302026-05-01T14:16:49+5:30
Eknath Shinde on Mumbai Pune Expressway Traffic Jam Updates: हेलिकॉप्टरमधून उतरताच प्रशासनाकडून घेतली वाहतूककोंडीची माहिती

टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
Eknath Shinde on Mumbai Pune Expressway Traffic Jam Updates: तीन दिवसांचा लाँग वीकेंड आणि मे महिन्याची सुट्टी यामुळे मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्यांची संख्या शुक्रवार सकाळपासून वाढली. वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेसवर वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. पण हळूहळू वाहने वाढल्यानंतर आणि मिसिंग लिंक कार्यक्रमामुळे पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी आज सकाळपासूनच मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर लेन बंद करण्यात आल्या होत्या. मोठा पोलिस बंदोबस्त होता. त्यामुळे मोठी वाहतूककोंडी झाली आणि त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला. याबाबत विविध माध्यमातून नेतेमंडळींना माहिती मिळाली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून आले असताना त्यांनीही वाहतूककोंडी झाल्याचे पाहिले. त्यानंतर त्यांनी लगेचच वाहतूककोंडीत अडकलेल्या वाहनांना टोल न घेता सोडण्याचे आदेश दिले. तसेच पोलिस उभे करून याची अंमलबजावणी होत असल्याची खात्रीही करून घेण्यास सांगितली.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
"आम्ही वरून (हेलिकॉप्टरमधून) पाहिले, पूर्ण ट्रॅफिक जाम झाले आहे. आजचा कार्यक्रम झाला की आपण लगेच वाहने त्या मार्गाने सोडू. पण तोपर्यंत मूळ मार्गावरून वाहने सोडायला सांगा. टोल-बिल घेऊ नका. थेट पोलिसांनाच गाड्या सोडायला सांगा. आदेश द्या की टोल घेऊ नका, पूर्णपणे सोडून द्या वाहनांना फ्री मध्ये.. आपले पोलिस तेथे उभे करा."
वाहतूककोंडीमुळे वाहनांमध्ये बिघाड, नागरिक सरकारवर संतापले...
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या कोंडीमुळे वाहने बंद पडण्यास सुरूवात झाली. घाटाची सुरूवात होतानाच तीव्र चढ असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिसरात तीव्र ऊन असल्याने वाहनांची इंजिन गरम होऊन वाहने बंद पडली. वाहतूककोंडीमुळे प्रवाशी चांगलेच संतापल्याचे दिसून आले. मिसिंग लिंकचे लोकार्पण दुपारी १ वाजता ठेवण्यात आले आहे, त्यामुळेच ही कोंडी झाली असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. भल्या सकाळी किंवा कालच्या दिवसात उद्घाटनाचा घाट घालायला हवा होता, असा सूर प्रवाशांमध्ये दिसून आला.