पुनर्वसन गावात आता गाव निर्माण शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 12:57 PM2020-09-05T12:57:11+5:302020-09-05T12:57:24+5:30
वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : नर्मदा नवनिर्माण अभियानातर्फे ५ सप्टेंबर म्हणजे शिक्षकदिनी शासनाचे सोशल डिस्टन्सिंगचे नियम ...
वसंत मराठे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : नर्मदा नवनिर्माण अभियानातर्फे ५ सप्टेंबर म्हणजे शिक्षकदिनी शासनाचे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत गावनिर्माण शाळांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. गोपाळपूर, नर्मदानगर, काथर्दे दिगर, रेवानगर या प्रकल्पबधितांच्या वसाहतीत नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे शासनाने शिक्षकदिनी विद्यार्थ्यांना आॅनलाईन शुभेच्छा देण्याचे आदेश दिले असताना नवनिर्माण अभियानाच्या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले आहे.
कोरोना महामारीमुळे गेल्या सहा महिन्यांपासून शाळा राज्य शासनाने बंद केल्या आहेत. सध्या या महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. त्याचा परिणाम लहान बालकांवर होऊ नये म्हणून शासनाचे अजूनही शाळा सुरू करण्याचे कुठलेही नियोजन नाही. तथापि, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जून महिन्यापासून आॅनलाईन शिक्षण सुरू केले आहे. असे असले तरी ग्रामीण व अतिदुर्गम भागात अनेक अडचणी असल्यामुळे आॅनलाईन शिक्षणात मोठे अडथळे येतात. म्हणून आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. त्यातच येणारा ५ सप्टेंबर म्हणजे शिक्षकदिनी राज्य शासनाने गुरूंना मानवंदना देण्यासाठी सोशल मीडियावर ‘थँक्स टीचर’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. मात्र नर्मदा नवनिर्माण अभियानाने शनिवारपासून गावशाळा निर्माण अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी रेवनगर, नर्मदानगर, गोपाळपूर पुनर्वसन व काथर्दे दिगर या सरदार सरोवर प्रकल्पबधितांच्या चार वसाहतींमध्ये अशा शाळा सुरू करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. तेथे या शाळांचे उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती एका कार्यकर्त्याने दिली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक वर्गनिहाय विद्यार्थ्यांना स्वंतत्र शिक्षण देण्यात येईल. हे शिक्षण विद्यार्थ्यांना झाडाखाली, समाज ओट्यावर दिले जाईल. यासाठी गावातील पदवीधर ग्रामस्थ अध्यापन करतील. प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात बाहेरगावी शिकणारे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांनाही या उपक्रमाचा फायदा होणार आहे. गावातील ग्रामस्थ, पदवीधर युवक यांनी उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन अभियानाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. या अभियानामार्फत प्रकल्पबाधितांच्या विविध वसाहतींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ‘जीवन शाळा’ सुरू आहेत. त्यातील अनेक विद्यार्थी उच्चशिक्षित झाले आहेत. त्यामुळे या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आता आॅफलाईन शिक्षण मिळणार असून विद्यार्थ्यांच्या हाती पाटी-पुस्तक दिसणार आहे. साहजिकच गावकऱ्यांनीदेखील या उपक्रमाचे कौतुक केले आहे.सर्वत्र आॅनलाईन शिक्षण सुरू असले तरी शहादा तालुक्यातील सरदार सरोवर प्रकल्पबधीतांच्या जीवननगर येथील वसाहतीत गेल्या महिनाभरापासून तेथील विद्यार्थ्यांना आॅफलाईन शिक्षण दिले जात आहे. साधारण ३०० विद्यार्थी हे शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्यांना गावातीलच सुशिक्षित तरुण शिकवीत आहेत. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून बंद झालेल्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या हाती पाटी-पुस्तक आल्यामुळे ते आनंदी झाले आहे.
शासनाने विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण सुरू केले असले तरी सातपुड्यातील ग्रामीण भागातील पालक स्मार्ट मोबाईल फोन घेऊ शकत नाही. शिवाय नेटची मोठी समस्या असल्याने हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचितच राहत आहेत. त्यामुळे आॅफलाईन शिक्षण पुन्हा सुरू करावे, अशी भूमिका घेतली आहे. शासनाच्या सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत व पालक-शिक्षकांशी चर्चा करून त्यांची समती घेऊन ५ सप्टेंबरपासून काही वसाहतींमध्ये गाव निर्माण शाळा सुरू करीत आहोत.
-मेधा पाटकर, विश्वस्त, नर्मदा नवनिर्माण अभियान.