एक कुटूंब, दोन पक्ष आणि दोन्ही झाले सत्तेचे वाटेकरी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 12:46 PM2020-02-20T12:46:38+5:302020-02-20T12:46:46+5:30
मनोज शेलार। लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :जिल्ह्यात आतापर्यंत घराणे आणि पक्ष यांची सांगड मजबूत मानली जात होती. ती परंपरा ...
मनोज शेलार।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :जिल्ह्यात आतापर्यंत घराणे आणि पक्ष यांची सांगड मजबूत मानली जात होती. ती परंपरा अनेक घराण्यांनी टिकवून देखील ठेवली होती. परंतु मध्यंतरीच्या कालखंडात पक्षनिष्ठा बदलल्या, पद आणि सत्ता यांना महत्त्व प्राप्त झाले. परिणामी कार्यकर्ते देखील सैरभैर होऊन सत्तेच्या मागे धावू लागले. सध्याचे जिल्ह्यातील चित्र तेच दर्शवीत आहे. एकाच घरात दोन पक्ष आणि दोन्ही पक्षातील सदस्यांना पदे हे बरेच काही सांगून जात आहे. नंदुरबारातील चंद्रकांत रघुवंशी परिवार, शरद गावीत परिवार, शहाद्यातील मोतिलाल पाटील परिवार ही काही त्यातील उदाहरणे आहेत.
जिल्ह्यातील राजकारण गेल्या काही वर्षात बरेच बदलले आहे. पूर्वी जिल्ह्यात केवळ दोन पक्ष होते. राष्टÑवादीचा जन्म होण्याअगोदर जिल्ह्यात काँग्रेस प्रबळ होती. त्यावेळी विरोधक फारच कमी होते. भाजप आणि शिवसेना काही ठिकाणी आपले अस्तीत्व दाखवत होती. परंतु एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर सत्ता मिळवेल अशी स्थिती त्यांची नव्हती. १९९९ मध्ये राष्टÑवादी काँग्रेस अस्तीत्वात आल्यानंतर आणि त्यात आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्यासारखे वजनदार नेते गेल्यामुळे या पक्षाचे अस्तित्व जिल्ह्यात निर्माण झाले. जिल्हाभरात पक्ष प्रबळ झाला. एकाच पक्षाच्या दुकानदारीत कंटाळलेले कार्यकर्ते दुसऱ्या दुकानात गेले आणि जिल्ह्यात काँग्रेस व राष्टÑवादी असे सामने होऊ लागले. साधारणत: २०१४ पर्यंत या दोन्ही पक्षात चुरस राहत होती. २०१४ मध्ये आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी राष्टÑवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपलाही बरे दिवस येवू लागले. पहिल्यांदा भाजपचा खासदार जिल्ह्यात निवडला. दोन आमदार निवडून येऊ लागले. गेल्या पंचवार्षीकला राज्यात भाजप सत्तेत असल्यामुळे या पक्षाने जिल्ह्यात काँग्रेसला मागे सारत पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून पुढे येण्यात यश मिळविले. गेल्या सहा महिन्यात शिवसेना देखील जिल्हाभरात अस्तित्व दाखवू लागली. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने सेनेला चांगले दिवस आले. राष्टÑवादीही काही ठिकाणी तग धरून आहे. गेल्या सहा महिन्यातील राजकारणातील चित्र मात्र पुर्णपणे बदलले. सत्ता आणि पदे यांना महत्व प्राप्त झाले. सध्याची स्थिती बरेच काही सांगून जात आहे.
नंदुरबारातील रघुवंशी घराणे पारंपारिक काँग्रेसशी एकनिष्ठ. परंतु सहा महिन्यांपूर्वी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणूक लढविली. पूत्र अॅड. राम रघुवंशी यांना निवडून आणले आणि उपाध्यक्षपदही मिळविले. दुसरीकडे त्यांच्या पत्नी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षा म्हणून विराजमान आहेत. पूत्र जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि पत्नी नगराध्यक्षा तेही वेगवेगळ्या पक्षांचे. अशीच स्थिती शहाद्यातील मोतिलाल पाटील यांच्या कुटूंबात. मोतिलाल पाटील हे भाजपकडून निवडून येत नगराध्यक्षपदी विराजमान आहेत. तर त्यांचे पूत्र अभिजीत पाटील यांनी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेत निवडून येत सभापतीपद मिळविले आहे. येथेही एकाच घरात दोन पदे आणि दोन वेगवेगळे पक्ष. तिसरे उदाहरण माजी आमदार शरद गावीत यांंच्या कुटूंबातील. शरद गावीत हे राष्टÑवादीचे, त्यांनी तीन जिल्हा परिषद सदस्य निवडूनही आणले. परंतु त्यांच्याच घरातील अर्थात त्यांच्या दोन्ही कन्यांना त्यांनी भाजपकडून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आणले. आज भाजपची जिल्हा परिषदेत सत्ता राहिली असती तर या कन्यांपैकी एकीला पद मिळाले असते. ही झाले स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदांची उदाहरणे. आता पक्ष नेतृत्त्वासाठी देखील एकाच घरात दोन पक्ष आणि दोन पदे अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून डॉ.विक्रांत मोरे आहेत. आता त्यांचे मोठे बंधू डॉ.अभिजीत मोरे यांनी चार महिन्यांपासून राष्टÑवादीची मोट हाती घेतली. जिल्हाध्यक्षपदाचे ते प्रमुख दावेदार मानले जात आहेत. त्यांना ते पद मिळाले तर एकाच घरात दोन पक्ष आणि दोन जिल्हाप्रमुख राहण्याचेही अनोखे उदाहरण पहावयास मिळणार आहे.
एकुणच जिल्ह्यातील राजकारणाचे स्थित्यंतर वेगाने सुरू आहे. पक्ष निष्ठा आणि ध्येय धोरणे या बाबी नगण्य मानल्या जात आहेत. जो नेता पक्ष वाढवेल, पक्षाचे अस्तित्व टिकवेल त्याला पक्षात घेणे, त्याला पदे देणे यालाच सर्व राजकीय पक्ष महत्व देवू लागले आहेत. अर्थात सत्ता मिळविण्यासाठी राजकीय पक्षांनी देखील आपली तत्वे बाजूला ठेवून व्यक्तीकेंद्रीत राजकारणाला महत्व देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे एकाच घरात दोन पक्ष, दोन पदे ही बाब आता सर्वमान्य म्हणूनच ठरण्याची शक्यता आहे.