लॉकडाऊनच्या कालावधीत नोकरी-व्यवसायानिमित्त इतरत्र असणारे गावकरी प्रथमच दीर्घकाळ थांबून होते. बहुतांश खासगी नोकरी करुन उदरनिर्वाह करणारे समविचारी असल्याने गावातील समस्या सोडवण्याचा चंगच त्यांनी बांधला. यातून एका सेवाभावी संंस्थेची स्थापन केली. यातून त्यांनी सर्वप्रथम गावातील विहिरीवर विजेचा ट्रान्सफार्मर बसवून पाण्याची सोय केली. यामुळे गावकऱ्यांना मुबलक पाणी वेळेवर उपलब्ध होऊ लागले. त्याचप्रमाणे गावात व इतर ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण संतुलनाचा प्रयत्न केला. दारूबंदीसाठी प्रयत्न करून अवैधरीत्या विक्री होत असलेल्या दारूची दुकाने बंद केली. यासह गावातील विकासासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण बाबींची पूर्तता त्यांनी केली. संस्थेच्या माध्यमातून गावात होत असलेल्या कामांचे फलित पाहून ग्रामस्थांनी त्यांना ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचा आग्रह केला. गावकऱ्यांच्या आग्रहाखातर गावातील ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गुलाब भील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नऊ जागा लढविल्या. पैकी आठ जागेवर त्यांचे उमेदवार निवडून आले आहेत, तर उर्वरित तीन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. विशेष म्हणजे यातील सात नवनिर्वाचित सदस्य आहेत. ते अवघ्या ३५ ते ४० वयोगटातील आहेत. या सर्वांनी गावातील सत्ताधाऱ्यांंचा पराभव करून गावकऱ्यांच्या मदतीने निवडणूक जिंकली आहे.
असलोद ग्रामपंचायतीत पॅनेल प्रमुख राजू वानखेडे व उप पॅनेल प्रमुख संजय जगताप, दरबार गिरासे, जगन शिरसाठ, योगेश मराठे, तसेच गावातील कार्यकर्ते यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत निवडणुकीत असलोद बीएसपी गाव विकास पॅनेलच्या नऊ पैकी सात उमेदवारांचा दणदणीत विजय झाला. यात एक महिला उमेदवार बिनविरोध, तर सात सदस्य निवडून आले आहेत. यात सरला अजय गिरासे, प्रकाश गुलाब भी,ल सुशीलाबाई प्रकाश भील, विलास प्रकाश पवार व संतोष देवीदास चव्हाण, अजय सोनवने बिनविरोध, सुलोचना दिलीप पवार, अजय दाजू सोनवणे, तुकीबाई प्रकाश भील, रेखा लीलाचंद पवार, दीपक भीमसिंग गिरासे हे सर्व उमेदवार बहुमताने निवडून आले.
गावकऱ्यांनी विश्वासाने आम्हाला मतदान केले आहे व सत्ता सोपविली आहे.
दरम्यान याबाबत पॅनेलचे संजय जगताप यांना संपर्क केला असता, गावकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आगामी पाच वर्षांच्या कार्यकाळात शासनाच्या सर्व योजनांचा लाभ गावातील प्रत्येक नागरिकाला देण्याचा प्रयत्न राहील. याचसोबत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. आगामी कालावधीत असलोद गावाला जिल्ह्यातील आदर्श गाव बनविण्याचा संकल्प केला असल्याची माहिती त्यांनी दिली.