गणेश विसर्जनासाठी गेलेली उत्तर प्रदेशातील तिघे गोदावरी पात्रात वाहून गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 14:46 IST2019-09-13T14:27:53+5:302019-09-13T14:46:27+5:30

विष्णुपुरीतून गोदावरी पात्रात पाणी सोडल्याने नदी प्रवाहित होती

Three boys from Uttar Pradesh drowing in Godavari in Ganesh Visarjana | गणेश विसर्जनासाठी गेलेली उत्तर प्रदेशातील तिघे गोदावरी पात्रात वाहून गेली

गणेश विसर्जनासाठी गेलेली उत्तर प्रदेशातील तिघे गोदावरी पात्रात वाहून गेली

ठळक मुद्देनदी पात्रात उतरताच पाण्याचा मोठा प्रवाह वेगाने आलाप्रशासनाकडून बचाव कार्य सुरू

नांदेड : गणेश विसर्जन पाहण्यासाठी नगीनाघाट येथे गेलेले तिघे जण वाहून गेल्याची तक्रार वजिराबाद पोलिस ठाण्यात आली असून या अनुषंगाने प्रशासनाने नदी परिसरात शोधमोहीम हाती घेतली आहे़ हे तीनही युवक उत्तर प्रदेशातील आझमगढ येथील असून जूनमध्ये ते नांदेडमध्ये बांधकाम मजूर म्हणून आले होते़ 

नांदेड शहरातील बहुतांश गणेश मंडळाचे विसर्जन शहरानजीकच्या बंदाघाट तसेच नगीनाघाट येथे केले जाते़ त्यामुळे गुरुवारी सायंकाळी या घाटावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती़ याच विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी अरविंद निषाद (वय १९), रामनिवास निषाद (वय २०) आणि धर्मेंद्र धरमंडरा (वय १७) हे तिघे नगीनाघाट येथे गेले होते़ गोदावरी नदीपात्रात विष्णुपूरीतून पाणी सोडल्याने नदी प्रवाहित झाली होती़

नदीपात्रात उतरताच पाण्याचा मोठा प्रवाह आल्याने हे तीनही तरूण नदीत वाहून गेले़ सुरुवातीला प्रशासनाकडून अशी कुठलीही घटना घडली नसल्याचे सांगितले होते़ मात्र त्याचवेळी दुसरीकडे पोलिसांच्या वतीने शोधही सुरू करण्यात आला होता़ शुक्रवारी ठेकेदार नंदी मिस्त्री यांनी वजिराबाद पोलिस ठाण्यात तीन्ही तरूण वाहून गेल्याची तक्रार दिली़ त्यानंतर शोधकार्याने आणखी वेग घेतला़ गोदावरी जीवरक्षक जिल्हा प्रशासनाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्नीशमन दल आणि पोलिसांच्या वतीने या तीन तरुणांचा शोध घेतला जात आहे़ 

तामसा येथेही युवकाचा बुडून मृत्यू
दरम्यान, तामसा ता़ हदगाव येथील शशिकांत प्रकाश कोडगिरवार (वय २३) हा युवक गणेश विसर्जनासाठी गेला होता़ खदानीत असलेल्या पाण्यात पडून त्याचा मृत्यू झाला़ तामसा पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे़

Web Title: Three boys from Uttar Pradesh drowing in Godavari in Ganesh Visarjana