नागपूर :विदर्भात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. शनिवारी अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांनी ‘हॉटस्पॉट’ची नोंद केली. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान तब्बल ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिक अक्षरशः होरपळून निघाले. सलग वाढणाऱ्या तापमानामुळे विदर्भातील जनजीवन विस्कळीत झाले असून दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडल्याचे चित्र अनेक शहरांत पाहायला मिळाले.
हवामान विभागाच्या नोंदीनुसार, अकोला येथे ४५.४ अंश सेल्सिअस, यवतमाळ आणि ब्रह्मपुरीतही ४५.२ अंश तापमानाची नोंद झाली. नागपुरात कमाल तापमान ४३.८ अंश सेल्सिअसवर पोहोचले, जे सरासरीपेक्षा ०.३ अंशांनी अधिक होते. उष्ण वाऱ्यांचा मारा आणि अंगाची लाही लाही करणारी कडक उन यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान सरासरीपेक्षा अधिक असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. सकाळच्या वेळेत वातावरणात आर्द्रता तुलनेने अधिक होती; मात्र दुपारपर्यंत हवा पूर्णपणे कोरडी झाल्याने उकाडा आणि उमस दोन्ही वाढले. त्यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांची अक्षरशः घालमेल उडाली.
दरम्यान, रात्रीच्या तापमानात किंचित घट नोंदविण्यात आली असली तरी उष्णतेची तीव्रता कायम आहे. नागपुराचे किमान तापमान २७.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. शनिवारी विदर्भातील कोणत्याही जिल्ह्यात पावसाची अधिकृत नोंद झाली नाही. तथापि, नागपूर शहरातील काही भागांमध्ये शनिवारी दुपारी ४ नंतर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. यामुळे काही काळ वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी उष्णतेच्या तीव्रतेत फारसा फरक पडला नाही.
उष्णतेची लाट कायम राहणार
हवामान विभागाने पुढील काही दिवस विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्माघातापासून काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रमुख शहरांचे तापमान (अंश सेल्सिअस)
वर्धा- ४६
अमरावती - ४६
अकोला - ४५.४
यवतमाळ- ४५.२
ब्रह्मपुरी - ४५.२
नागपूर - ४३.८
चंद्रपूर- ४३.६
वाशिम- ४३.२
गडचिरोली- ४२.६
गोंदिया - ४२.२
भंडारा - ४२
बुलडाणा - ४१.६
Web Summary : Vidarbha grapples with intense heatwave; Amravati and Wardha hit 46°C. Akola, Yavatmal, and Nagpur also face soaring temperatures, disrupting daily life. Heat wave warning issued.
Web Summary : विदर्भ भीषण गर्मी की चपेट में; अमरावती और वर्धा में तापमान 46 डिग्री सेल्सियस तक। अकोला, यवतमाल और नागपुर में भी तापमान बढ़ने से जनजीवन अस्त-व्यस्त। लू का अलर्ट जारी।