शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

'मदारीं'च्या जीवनाचाच 'तमाशा'; प्रशासनाने टाकले वाळीत, अमृत काळात समाज उपेक्षित

By मंगेश व्यवहारे | Updated: August 14, 2023 12:42 IST

सरकारने हिरावला रोजगार : 'उज्ज्वला' योजना दूरच, लोकप्रतिनिधी फिरकतच नाहीत; मुला- मुलींच्या शिक्षणाची वाईट अवस्था

मंगेश व्यवहारे

नागपूर : सरकारचे काही निर्णय या देशात भटकंती करणाऱ्या समाजाच्या जगण्यावर घात करणारे ठरले आहेत. यात मुस्लीम मदारी हादेखील एक समाज आहे. मनेका गांधींनी वन्यजीव बाळगण्यावर व त्यांचे खेळ दाखविण्यावर बंदी आणली आणि या समाजाचा रोजगारच हिरावला. नागपूर शहरात कळमना रेल्वे क्रॉसिंगच्या काठावर मदारी समाजाची वस्ती आहे. जवळपास २५० झोपड्या तिथे आहेत. दोन हजारांच्या जवळपास लोक येथे राहतात. सरकारने रोजगार हिरावल्याची खंत त्यांना आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधींनी या वस्तीला माणसांची वस्ती म्हणून कधी बघितले नाही, त्यामुळे वाळीत टाकल्यासारखे जीवन ते व्यतीत करीत आहेत. सरकार स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव साजरा करतेय. नुकताच नागपूरकरांनी जी-२० चा लखलखाट अनुभवला आहे. 'मेरी माटी, मेरा देश'सारख्या उपक्रमातून मातीचे वंदन, वीरांचे वंदन, वनसंपदेचे संगोपन, सेल्फी आणि दिवेही पेटविले जात आहेत. या अमृत काळात हा मदारी उपेक्षित आहे. या वस्तीचे हाल बघितल्यावर या मदाऱ्यांच्या जगण्याचा तमाशा झाल्याचे दिसते.

'लोकमत'च्या प्रतिनिधींनी पूर्व नागपुरातील कळमना रेल्वे ट्रकच्या काठावर वसलेल्या आदिवासी प्रकाशनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मदारी वस्तीला भेट दिली. या वस्तीत सर्वच लोक मुस्लीम आहेत. त्यांची जमात मदारी आहे. वस्तीमध्ये एक ६५ ते ७० वर्षांचे वृद्ध फत्तुभाई घरासमोर खुर्चीवर बसले होते. फत्तुभाईला विचारले 'क्या करते हो, तर ते म्हणाले, 'पहले गाव गाव घुमता था, लोगों को साप, नेवले का खेल दिखाता था. २० सालसे घर में बैठा हू.

फत्तुभाई आजारी आहे. परिस्थितीमुळे औषधपाण्यावाचून जगत होते. याच वस्तीतील सय्यद असलम पन्नाशी गाठलेले. उर्दू, मराठी, हिंदी भाषा अवगत असलेले आणि साप मुंगसाचा खेळ दाखविण्यात तरबेज आपल्या कलात्मक शैलीत बोलताना म्हणाले, स्वातंत्र्याच्या ५० वर्षांत आमच्या डोक्यावरचे चिंधीचे पाल हटले आणि टिनाचे शेड आले, एवढाच आमच्या जीवनात बदल झाला. सय्यद असलमने वस्ती बघण्याचा आग्रह धरला. वस्तीच्या गल्लीबोळात सकाळची वेळ असल्याने घराघरांपुढे चुलीवर अन्न शिजत होते. चुलीतील धुरांचे लोट बाजूला करून विस्तवाचा भडका करताना फुंकर मारून मारून डोळे चोळणाऱ्या महिलांना बघून लक्षात आले की येथे 'उज्ज्वला' योजना पोहोचलेली नाही. वस्तीतील गडरचे चेंबर तुंबल्याने घरा समोरून घाणीचे लोट वाहत होते. लहान लहान मुले त्यात पाय भरवून घरात जात होते.

घाणीच्या त्रासामुळे कंटाळलेल्या एका महिलेने घरातील अवस्थाच दाखविली. शौचालयात घाण तुंबलेली होती. जमिनीला ओल सुटली होती. जुलैच्या पावसात झालेले हाल बेहाल संतप्त होऊन सांगत होती. शौचालयात तुंबलेल्या घाणीमुळे वस्तीतील महिलांना उघड्यावर जावे लागत असल्याची वेदना तिने बोलून दाखविली. कुणी रस्त्याचे झालेले बेहाल दाखविले. कुणी विजेचे आलेले भरभक्कम बिल दाखविले. घाणीमुळे घराघरात लहान मुले आजारी असल्याचे सांगितले, आम्हाला कुणी माणसेच समजत नसल्याची वेदना लोकांनी व्यक्त केली. येथील तरुण मुले व पुरुष मंडळी वस्त्यांमध्ये चादर विकून पोटापाण्याची सोय करतात. महिला व मुली घरातच असतात. कुणीही कामासाठी बाहेर जात नाही. चादर विकून आलेल्या पैशातून कुटुंबाची गुजराण करतात. लहान मुले जवळच असलेल्या महापालिकेच्या शाळेत जातात पण शिक्षणाचे बेहाल आहेत.

डिप्टी सिंग्नलमधील सरकारी दवाखानावर त्यांचे आरोग्य टिकलेले - आहे. ज्येष्ठ व महिलांना रोजगार नाही. दिवसभर वस्त्या राखण्याचे काम करतात. निरक्षरता, मागासलेपणा, अस्वच्छता हेच त्यांच्या नशिबी आले आहे. २४ वर्षीय अली सय्यद सातवीपर्यंत शिकला. त्याचे लग्न झाले असून, दोन मुले आहेत. गांधीबागेतून चादरी आणतो आणि शहरभर विकतो. आपण शिकू शकलो नाही, याची त्याला खंत आहे. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवितो. पण दर्जेदार शिक्षणापासून मुले दूर आहेत. बऱ्याच मुलांना स्वतःचे नावही लिहिता येत नाही. पोषण आहार, गणवेश मिळतात म्हणून मुले शाळेत जातात. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. वस्तीतील सबिना शेख हिचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. पुढचे शिक्षण घेण्याची इच्छा आहे. पण परिस्थिती नाही. ती वस्तीतील मुलींना शिकविते. ४० मुली तिच्याकडे यायच्या. आता जागा नसल्याने ती वस्तीशाळाही बंद आहे. सबिना म्हणाली, येथील मुला- मुलींच्या शिक्षणाची फार वाईट अवस्था आहे.

ही पारंपरिक कला लुप्त होत आहे

सय्यद अस्लम यांनी लगेच झोपडीतून डमरू, बासरी आणि साप ठेवण्याची टोपली आणली आणि खेळ दाखवायला लागले. पोट भरण्यासाठी आमचा खरा धंदा तर साप नाग खेळवण्याचा होता. मानवी वस्तीत आलेले साप पकडायचो, त्यांना बांबूच्या बुट्टीत ठेवायचो आणि त्यांचाच खेळ करून उपजीविका करायचो. त्याच्या जोडीला थोडीफार हातचलाखी करायचो. खेळ संपल्यावर पैसापाणी मागायचो. आम्ही सापाला कधी त्रास दिला नाही. मुलासारखे त्याला सांभाळायचो. आमच्या समाजाची ही पारंपरिक कला होती. मनेका गांधी यांनी त्यावर बंदी आणल्याने आमचा रोजगारही हिरावला आणि आता कलाही लुप्त झाली आहे. आता वस्तीतील तरुण मुले चादर विकून उपजीविका करतात.

वयोवृद्धांना वेदना आहेत

वस्तीतील बाया रिकाम्या आहेत. त्यांच्या हाताला घरगुती काम मिळाले पाहिजे. वस्तीत सोयीसुविधा नाहीत. घाणीच्या विळख्यात आम्ही जगतो आहे. अनेक ज्येष्ठ महिला आहेत. त्यांच्या आजारपणासाठी सरकारी योजना आमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. वस्तीत प्रशासन, लोकप्रतिनिधी ढुंकूनही बघत नाही. घरात शौचालय असूनही महिलांना उघड्यावर जावे लागते. आमच्या जगण्याच्याच वेदना आहेत.

- मुमताज रफिक सय्यद, स्थानिक रहिवासी

तरुणपणी साप-मुंगसाचे खेळ दाखविण्यासाठी गावोगावी फिरणारे वस्तीतील काही लोकं वृद्ध झाले आहेत. हाताला रोजगार नसल्याने दिवसभर वस्ती राखण्याचे काम करतात. मुलांच्या भरवशावर त्यांचे जगणे आहे. आमच्यापर्यंत कधी निराधार योजना पोहोचली नाही. आम्ही कलावंत असूनही कलावंतांची पेन्शन मिळाली नाही. सरकारने आमच्यासारख्या ज्येष्ठांना साप व मुंगसाचा खेळ दाखविण्याची सूट दिल्यास आम्हाला दोन पैसे मिळतील.

- गरीबखाँ मदारी, ज्येष्ठ नागरिक

टॅग्स :Socialसामाजिकnagpurनागपूर