राज्यात उद्दिष्टाच्या २०.९३ टक्केच तूर खरेदी ; एमएसपी दराने खरेदीवर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 13:30 IST2026-05-06T13:25:46+5:302026-05-06T13:30:11+5:30
Nagpur : एसएसपी दराने तूर खरेदीची मुदत ३० एप्रिल रोजी संपुष्टात आली. सरकारने ९० दिवसांमध्ये राज्यात एकूण उत्पादनाच्या २७.०२ टक्के, तर उद्दिष्टाच्या २०.९३ टक्के तुरीची एमएसपी दराने खरेदी केली आहे.

Only 20.93 percent of the target for tur procurement in the state; Question mark on procurement at MSP rate
सुनील चरपे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एसएसपी दराने तूर खरेदीची मुदत ३० एप्रिल रोजी संपुष्टात आली. सरकारने ९० दिवसांमध्ये राज्यात एकूण उत्पादनाच्या २७.०२ टक्के, तर उद्दिष्टाच्या २०.९३ टक्के तुरीची एमएसपी दराने खरेदी केली आहे. राज्यातील ३१,७४७ नोंदणीकृत शेतकऱ्यांकडील तुरीचे मोजमाप शिल्लक असताना खरेदी बंद करण्यात आली.
सन २०२५-२६ च्या हंगामात राज्यात १२.६१ लाख टन तुरीचे उत्पादन होण्याचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने व्यक्त केला आहे. त्याअनुषंगाने राज्यात ९० दिवसांत ३.३७ लाख टन तूर एमएसपी दराने खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. तूर खरेदीसाठी नाफेड व एनसीसीएफने एकूण ९८४ खरेदी केंद्रांना मंजुरी देत ८९७ केंद्र सुरू केले. या केंद्रांवर ७३,५५५ शेतकऱ्यांनी तुरी विकण्यासाठी नोंदणी केली आणि त्यातील ७०,६२९ शेतकऱ्यांना पात्र ठरविण्यात आले. या शेतकऱ्यांकडून दोन्ही संस्थांनी ७०,५३१.४२१४ टन तूर खरेदी केली. ही खरेदी उद्दिष्टाच्या २०.९३ टक्के तर एकूण उत्पादनाच्या २७.०२ टक्के आहे.
नाफेड व एनसीसीएफने राज्यात २० जानेवारीपासून नोंदणी तसेच १ फेब्रुवारीपासून खरेदीला सुरुवात केली.
चालू हंगामासाठी केंद्र सरकारने तुरीची एमएसपी प्रतिक्विंटल आठ हजार रुपये जाहीर केली होती.
आयातीमुळे मध्यंतरी चांगल्या प्रतीच्या तुरीचे दर प्रतिक्विंटल ७,००० ते ७,६०० रुपयांपर्यंत खाली आले होते.
सरकारने खरेदीला मुद्दाम विलंब केल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना बाजारभावाप्रमाणे तुरी विकल्या.
यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
३१,७४७ शेतकरी शिल्लक
राज्यात नाफेडकडे ६५,३२७ शेतकऱ्यांनी तुरी विकण्यासाठी नोंदणी केली होती. यातील ६२,५४३ शेतकऱ्यांना नाफेडने पाच ठरविले असून, ३४,०७७ शेतकऱ्यांकडून ६३,९४२.१३३५ टन तूर खरेदी केल्याने त्यांच्याकडील २८,४६६ शेतकऱ्यांकडील तुरीचे मोजमाप शिल्लक आहे. एनसीसीएफकडे ८, २२८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असली तरी यातील ८,०८६ शेतकरी पात्र ठरविण्यात आले. यातील ४,८०५ शेतकऱ्यांकडील ६,५८९.२८७९ टन तूर खरेदी केली असून, ३,२८१ शिल्लक शेतकऱ्यांना त्यांच्याकडील तुरी एमएसपीपेक्षा कमी दराने खुल्या बाजारात विकाव्या लागल्या.
देशात उत्पादनाच्या ५.२१ टक्के खरेदी
केंद्रीय कृषी मंत्रालयाने २०२५-२६ च्या हंगामात देशभरात ३४.५५ लाख टन तुरीचे उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. यातील २२ लाख टन तुरी एमएसपी दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. १ मे रोजी ही खरेदी बंद करण्यात आली. वास्तवात सरकारने १.८० लाख टन तूर एमएसपी दराने खरेदी केली. ही खरेदी एकूण उत्पादनाच्या ५.२१ टक्के तर उद्दिष्टाच्या ८.१८ टक्के इतकी आहे.