'एआय'ला करा शिवाराचा साथीदार : हवामान बदलाच्या संकटात शेतकऱ्यांची ढाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 12:08 IST2025-06-02T12:03:15+5:302025-06-02T12:08:38+5:30
Nagpur : ‘स्मार्ट फार्मिंग’ची वाटचाल सुरू; महाराष्ट्र सरकारकडून ५०० कोटींचा टेक्नो-बूस्ट!

Make 'AI' farmer's companion: AI is Farmers' shield in the crisis of climate change!
सुनील चरपे
नागपूर : हवामानाचे चक्र बिघडले आहे, जमिनीचा पोत बदलतोय, किडींची वाढलेली प्रतिकारशक्ती व नव्या प्रजाती आणि या सर्वांचा थेट परिणाम होत आहे शेतकऱ्यांच्या रोजच्या संघर्षांतर. शेतमालाची उत्पादकता घटतेय, खर्च वाढतोय आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न डोके तर काढतोय. अशा वेळेस आधुनिक तंत्रज्ञानाचा किरण म्हणजेच 'कृत्रिम बुद्धिमत्ता' (एआय) शेतकऱ्यांसाठी आशेचा नवा किरण ठरू शकतो का? जगभर शेतीत 'एआय'चा उपयोग करून अचूक हवामान अंदाज, कीड व्यवस्थापन, रोबोटिक तंत्र, आणि 'स्मार्ट फार्मिंग' सुरू आहे. मात्र, भारतात याची शक्यता, अडथळे व भविष्यातील दिशा यावर व्यापक चर्चा गरजेची आहे. कारण, जर शेती वाचवायची असेल तर तिला शहाणपणाचा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार लागणारच आहे. राज्य सरकारने सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात शेतीक्षेत्रातील एआय आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी पुढील दोन वर्षांकरिता ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याअनुषंगाने राज्यात कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिरांद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. काही कंपन्यांनी यावर काम सुरू केले असून, त्यांनी केलेल्या अभ्यास व प्रयोगांची प्रात्यक्षिके दाखविली जात आहे.
फूड टेक्नॉलॉजीसह शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या प्रत्येक उद्योगांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करता येतो. एआयचा वापर कोरडवाहू शेतकन्यांनी कसा करावा, यावर विचार करणे गरजेचे आहे. या तंत्रज्ञानाच्या वापराचा भांडवली खर्च, हाताळणी व देखभाल खर्च, गुंतवणूक याच्या ताळेबंदाचा विचार व्हावा. अन्यथा सेन्सर, ड्रोन, सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या कंपन्या व स्वयंचलित हवामान निरीक्षण केंद्रांना या तंत्रज्ञानातून नफा मिळेल आणि शेतकरी लुटला जाईल.
'अॅप'द्वारे लगेच सूचना
यासाठी विशिष्ट अॅप विकसित केले जात आहे. त्या अॅपद्वारे सॅटेलाईट मॅपिंगमुळे शेतातील मातीत असलेली अन्नद्रव्ये, ओलावा, वाफसा, तापमान, पिकांना पाण्याची गरज, पाण्याचे बाष्पीभवन याची अचूक माहिती व आकडेवारी मिळते. पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भावाची सुरुवात होताच त्याचीही सूचना दिली जाते. या तंत्रज्ञानामुळे पाण्याचा किमान ४० टक्के व खतांचा ३० टक्के वापर कमी होत असून, पीक उत्पादनात ४० टक्के वाढ होऊ शकते.
मूलभूत सुधारणा आवश्यक
भारत उष्णकटिबंधीय प्रदेश असल्याने परिस्थितीनुसार आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांची तंत्रज्ञान व कौशल्य निपुणता विचारात घेणे, वैज्ञानिक क्लिष्टता टाळणे, कृषी निविष्ठा वाजवी दरात तसेच सरकारी अनुदानावर सहज उपलब्ध करून देणे, जमिनीतील सेन्सर इनपुटसाठी २४ तास वीजपुरवठा, सॅटेलाईट मॅपिंग सपोर्ट, जीपीएस, इंटरनेट ऑफ थिंग्जसाठी नेटवर्क उपलब्धता, ओव्हरहेड लाईट वायर, ट्रान्सफार्मर, पक्षी यामुळे ड्रोनचे तसेच वन्यप्राण्यांमुळे या संयंत्रांचे होणारे नुकसान यासह अन्य महत्त्वाच्या बाबींवर विचार करणे व त्यात सुधारणा करणे अत्यावश्यक आहे.