सव्वा दोन कोटींचे सोने लंपास करणारी ‘गोल्डन गँग’ गायब; चार महिने होऊनही पकडण्यात यश नाही
By नरेश डोंगरे | Updated: March 9, 2026 20:24 IST2026-03-09T20:23:58+5:302026-03-09T20:24:45+5:30
हायटेक तपासाला चोरट्यांचा गुंगारा : रेल्वे पोलिसांचे सोलापुरात ढुंढो ढुंढो रे साजना : चार महिने होऊनही कुणीच हाती लागेना

'Golden Gang' that looted gold worth 2.25 crores disappears; No arrests even after four months
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चार महिन्यांपूर्वी हावडा-मुंबई मेलमधून सव्वादोन कोटींचे सोने लंपास करणारी गोल्डन गँग चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत आहे. विशेष म्हणजे, या टोळीतील गुन्हेगारांचे नाव पत्ता पोलिसांना माहिती आहे आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या मते हायटेक पद्धतीने या टोळीचा कसून शोध घेतला जात आहे. मात्र चार महिन्यांचा कालावधी होऊनही या टोळीतील कोणताही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नसल्याने चोरटे पोलिसांपेक्षा हायटेक झाले का, असा प्रश्न चर्चेला आला आहे.
सराफा व्यापारी किशोर ओमप्रकाश वर्मा (वय ४४, रा. गणपतीनगर, रा. जळगाव) हे रविवारी, १२ ऑक्टोबर २०२५ ला हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेसमधून प्रवास करीत होते. त्यांच्याजवळ असलेेले २ कोटी, ११ लाखांचे सोने बडनेरा रेल्वे स्थानकाजवळ चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी रेल्वे पोलिसांना गुन्हा दाखल केला. त्याचा तपास नागपूर रेल्वेच्या क्राइम ब्रँचला (एलसीबी) सोपविण्यात आला आहे. रेल्वेतील या धाडसी चोरीचा तपास पोलिसांनी अत्यंत हायटेक पद्धतीने सुरू केला. त्यानुसार, ही टोळी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात असल्याचे स्पष्ट झाले. रेल्वेत हात मारणाऱ्या या टोळीत किती आणि कोणकोण होते, त्यांची नावेही पोलिसांना माहित झाली. मात्र, टोळीच्या किंवा टोळीतील एकाही सदस्याच्या मुसक्या आवळण्यात रेल्वेच्या एलसीबीला यश आलेले नाही.
विशेष म्हणजे, चोरीच्या या घटनेला आज पूर्ण चार महिने झाले आहे. त्यामुळे चोरटे पोलिसांच्या हाती लागले तरी त्यांनी आतापर्यंत चोरलेले सोने शाबूत ठेवले असेल का, ते सोने परत मिळेल का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. या संबंधाने रेल्वेच्या पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, 'आरोपी लवकर पकडू', असा विश्वास त्यांंनी व्यक्त केला.
चोरीनंतर दुसऱ्या प्रांतात ऐशोआराम
पश्चिम महाराष्ट्रातील या कुख्यात टोळीने यापुर्वी अशाच प्रकारे मराठवाडा, आंध्र प्रदेशसह अनेक प्रांतात अशाच अनेक धाडसी चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे. एका ठिकाणी चोरी केल्यानंतर आप्तांसह दुसऱ्या प्रांतात पळून जायचे आणि सोन्याची विल्हेवाट लावून प्रकरण शांत होईपर्यंत तिकडे 'ऐशोआराम' करायचा, अशी या टोळीतील कुख्यात गुन्हेगारांची पद्धत असल्याची सूत्रांची माहिती आहे.