बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
By योगेश पांडे | Updated: April 25, 2026 12:25 IST2026-04-25T12:24:46+5:302026-04-25T12:25:29+5:30
धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी नागपुरात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात केलेल्या विधानावरून वादाला तोंड

बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे संतापाचे वातावरण आहे. नागपुरातील भोसले राजघराण्यातील राजे मुधोजी भोसले यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात चुकीचे वक्तव्य खपवून घेणार नाही. शिवाजी महाराजांच्या पुण्याईमुळे आज ते बागेश्वर बाबा आहेत, अन्यथा मौलवी बाबा राहिले असते, या शब्दांत त्यांनी टीका केली.
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; होतेय अटकेची मागणी, काय घडलं?
श्री आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेद्वारा प्रस्तावित भारतदुर्गा शक्ती स्थळाच्या जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या परिसरात शिलान्यास सोहळ्यादरम्यान शुक्रवारी धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते.
"छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले व ते रामदास स्वामींकडे गेले. आता मला जास्त लढायचे नाही आणि हे मुकुट व राजपाट तुम्ही सांभाळा,' असे ते त्यांना म्हणाले होते. त्यावेळी रामदास स्वामी त्यांना म्हणाले की, ठीक आहे. मात्र, शिष्याचे कर्तव्य हे गुरूच्या आदेशांचे पालन करणे हे आहे. त्यामुळे आता माझी ही सत्ता तुम्ही सांभाळावी असे गुरू म्हणून मी सांगतो, असे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटले होते," असा दावा शास्त्री यांनी केला होता. यावरून भोसले यांनी शास्त्रींवर टीका केली.
"उत्तर भारतातून एनसीईआरटीची सुपारी घेतल्याच्या आविर्भावात महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांबाबत शास्त्री यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याचा मी निषेध करतो. महाराजांनी देव, देश आणि धर्मासाठी आयुष्य वेचले हेच सत्य आहे. जे लोक स्वतःला धर्माचे रक्षक म्हणवतात, तेच महाराजांबद्दल वादग्रस्त आणि चुकीची विधाने करत आहेत. शिवाजी महाराजांच्या पुण्याईमुळे आज ते बागेश्वर बाबा आहेत, अन्यथा मौलवी बाबा झाले असते. आम्ही साधू संतांचा आदर करतो व भविष्यातदेखील करू. मात्र शास्त्री यांच्या वक्तव्याचा निषेध आहे," असे राजे मुधोजी भोसले यांनी स्पष्ट केले.