शरद जोशींचे आंदोलन म्हणजे विरोधाभासच

By Admin | Updated: November 25, 2014 00:54 IST2014-11-25T00:54:00+5:302014-11-25T00:54:00+5:30

शेतकऱ्यांशी संबंधित निरनिराळ्या मागण्यांसाठी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाची घोषणा केली आहे. परंतु आजपर्यंत ज्या शासनाचा सातत्याने विरोध केला

The agitation of Sharad Joshi is that of the conflict | शरद जोशींचे आंदोलन म्हणजे विरोधाभासच

शरद जोशींचे आंदोलन म्हणजे विरोधाभासच

विजय जावंधिया यांची टीका : विदर्भ गौरव पुरस्काराने झाला सन्मान
नागपूर : शेतकऱ्यांशी संबंधित निरनिराळ्या मागण्यांसाठी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाची घोषणा केली आहे. परंतु आजपर्यंत ज्या शासनाचा सातत्याने विरोध केला त्यांच्याकडेच मागणी करायला जाणे हा विरोधाभासाचाच प्रकार आहे या शब्दांत विजय जावंधिया यांनी शरद जोशींवर जोरदार हल्लाबोल केला. कृषी विकास प्रतिष्ठानतर्फे स्व.माणिकलालजी गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणाऱ्या विदर्भ गौरव पुरस्काराने जावंधिया यांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रभाषा संकुल येथील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान जावंधिया यांनी मतप्रदर्शन केले.
देशातील शेतकऱ्यांच्या गरिबीचे कारण या व्यवस्थेतच आहे. ही बाब लक्षात आल्यामुळेच मी व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी आंदोलनात उतरलो. परंतु शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या हक्कापेक्षा स्वत:च्या स्वार्थाला जास्त प्राधान्य दिले. कार्यकर्ते जीव तोडून मेहनत करत होते आणि जोशी यांनीच नेहमी सर्व श्रेय लाटले. कार्यकर्त्यांच्या क्षमतांना वाव देण्यात जोशी अपयशी ठरले असे जावंधिया म्हणाले. उणे सबसिडीचे गणित शेतकऱ्यांच्याच अंगावर उलटले. शेतकऱ्यांच्या गरिबीचे कारण या व्यवस्थेत आहे. त्यामुळेच व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी आंदोलनात पडलो. पण अजूनही उत्तर काही सापडले नाही अशी खंतदेखील त्यांनी व्यक्त केली. विदर्भ गौरव पुरस्कार वितरणप्रसंगी माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, माजी खासदार दत्ता मेघे, माजी वनमंत्री नानाभाऊ एम्बडवार, माजी मंत्री रमेश बंग, कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी, कार्याध्यक्ष श्रीराम काळे, उपाध्यक्ष सोमेश्वर पुसदकर, सचिव बंडोपंत उमरकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. शाल, श्रीफळ व २५ हजार रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरुप होते. देशातील शेतकरी सर्वात दुर्दैवी आहे. त्याच्या शोषणावरच देशाची अर्थव्यवस्था आधारित आहे अशी टीका एम्बडवार यांनी केली. पुरोहित व बंग यांनीदेखील आपले मत यावेळी मांडले. गिरीश गांधी यांनी प्रास्ताविक केले तर डॉ.कोमल ठाकरे यांनी संचालन केले.(प्रतिनिधी)
मी पक्ष का बदलविले?
या कार्यक्रमप्रसंगी दत्ता मेघे यांनी चांगलीच शाब्दिक फटकेबाजी केली. चांगल्या लोकांचे विचार कृतीत येणे आवश्यक असते. त्यासाठी पद मिळणे फार आवश्यक असते. मी पक्ष बदलविले म्हणून माझ्यावर टीका होते. पण त्यात गैर ते काय? शेवटी सन्मान अन् भविष्याचाही विचार करायला हवा. माझ्या मुलाने लोकसभा निवडणुकीच्या वेळी माझे ऐकले नाही, अन्यथा तो खासदार राहिला असता असे ते म्हणाले.

Web Title: The agitation of Sharad Joshi is that of the conflict