चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 10:44 IST2026-04-28T10:38:26+5:302026-04-28T10:44:39+5:30
३५ दिवसांमध्ये सापडले राज्यात ६ हजार नवे क्षयरोगी, क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सध्या ‘एआय’आधारित व्हीएमटीबी टूलचा वापर केला जात आहे.

चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
सोमनाथ खताळ
बीड - देशाला क्षयरोगमुक्त (टीबीमुक्त) करण्यासाठी केंद्र सरकारने १०० दिवसांची विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेतून धक्कादायक वास्तव समोर आले असून, देशातील दीड लाख, तर एकट्या महाराष्ट्रातील ११ हजार ९१ गावांना क्षयरोगाचा धोका आहे.
२४ मार्च २०२६ पासून सुरू झालेल्या या मोहिमेच्या पहिल्या ३५ दिवसांतच राज्यात ६ हजार १११ नवे क्षयरोगी आढळले आहेत. क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सध्या ‘एआय’आधारित व्हीएमटीबी टूलचा वापर केला जात आहे. या तंत्रज्ञानाद्वारे राज्यातील ११ हजार ९१ गावे ‘हाय रिस्क’ म्हणून निवडली आहेत.
भौगोलिक स्थिती : झाडे, प्रदूषण आणि जलाशयांची स्थिती.
आरोग्य स्थिती : कुपोषण, लसीकरणाची व्याप्ती, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोग रुग्णांची संख्या.
जीवनशैली : दारू आणि तंबाखूचे सेवन करणारे लोक, दाट लोकवस्ती आणि कामाच्या ठिकाणाचा डेटा.
दीड कोटी लोकांची होणार तपासणी
या मोहिमेअंतर्गत राज्यातील ११ हजार गावांमधील दीड कोटी लोकांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत २,६७७ शिबिरांच्या माध्यमातून ५ लाख ४९ हजार ४३५ लोकांची नोंदणी झाली आहे. संशयित १ लाख १४ हजार ६१२ जणांच्या थुंकीची तपासणी केली असता ६,१११ नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यांची नोंद ‘निक्षय’ ॲपवर केली असून, उपचार सुरू झाले आहेत.
१०० दिवसांचा हा कार्यक्रम असून, ११ हजार गावे हायरिस्क आहेत. १४ वर्षांवरील प्रत्येकाची तपासणी केली जात आहे. - डॉ. आर. बी. पवार, उपसंचालक, क्षयरोग, पुणे
यवतमाळ ५३९, अमरावती ५०४, नाशिक ४८८, रायगड ४८८, नागपूर ४८२, पुणे ४७९, चंद्रपूर ४६७, सातारा ४४२, गडचिरोली ४३३, नांदेड ४०४, अहिल्यानगर ४०१, रत्नागिरी ३८८, जळगाव ३८३, बुलढाणा ३६४, वर्धा ३५३, बीड ३४४, छत्रपती संभाजीनगर ३३९, कोल्हापूर ३१०, सोलापूर २९१, अकोला २४९, जालना २४२, गोंदिया २३९, लातूर २३८, नंदुरबार २३८, पालघर २३१, भंडारा २२६, परभणी २१२, ठाणे २१२, वाशिम १९८, सिंधुदुर्ग १८९, धाराशिव १८५, सांगली १८४, हिंगोली १७८, धुळे १७१