बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 12:14 IST2026-04-28T11:33:38+5:302026-04-28T12:14:37+5:30
Mumbai Food Poisoning News: मुंबईमधील पायधुनी परिसरात राहणाऱ्या कुटुंबातील चार जणांचा बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगडाचं सेवन केल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेच्या कारणांबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
मुंबईमधील पायधुनी परिसरात राहणाऱ्या कुटुंबातील चार जणांचा बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगडाचं सेवन केल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेच्या कारणांबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, पोस्टमार्टेमच्या प्राथमिक अहवालातून या चौघांच्याही मृत्यूमागच्या प्राथमिक कारणाबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. किडनी फेल होणं हे या चौघांच्याही मृत्यूमागचं कारणं असू शकतं असे संकेत पोस्टमार्टेममधून मिळाले आहेत.
मुंबईतील पायधुनी परिसरात राहणाऱ्या दोकाडिया कुटुंबातील अब्दुल्ला दोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन दोकाडिया, मुलगी आएशा दोकाडिया आणि दुसरी मुलगी जेनब दोकाडिया यांचा बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्याने झालेल्या या दुर्घटनेत मृत्यू झाला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २५ एप्रिल रोजी रात्री दोकाडिया कुटुंबातील एकूण ९ सदस्यांनी रात्री १०.३० च्या सुमारास एकत्र बसून भोजन केले होते. त्यानंतर नातेवाईक आपापल्या घरी परतले होते. रात्री उशिरा १ ते दीड वाजण्याच्या सुमारास दोकाडिया कुटुंबातील या चौघांनी कलिंगड खाल्ले होते. त्यानंतर पहाटे साडे पाच ते सहाच्या सुमारास या चौघांचीही प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी या सर्वांना मृत घोषित केले.
दरम्यान, या चौघांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर कुटुंबातील एका सदस्याने या चौघांनीही रात्री भोजनात बिर्याणी खाल्ली होती. तसेच रात्री उशिरा कलिंगड खाल्लं होतं, अशी माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, अन्न विषबाधेमुळे या चौघांच्याही किडन्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती, असे पोस्टमार्टेमच्या रिपोर्टमधून समोर आले आहे. आता या चौघांनाही ही अन्न विषबाधा नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, याचा तपासा पोलीस करत आहेत. या चौघांच्याही मृतदेहाच्या व्हिसेरा तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले आहेत. तसेच हिस्टोपॉथोलॉजिकल रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येणार आहे.