परळी, घृष्णेश्वर, भीमाशंकर, देहू या तीर्थक्षेत्रांचा होणार कायापालट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 08:36 IST2026-05-19T08:36:42+5:302026-05-19T08:36:59+5:30
सहा तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी ९९३ कोटी; कामे कालमर्यादेत पूर्ण करा : मुख्यमंत्री

परळी, घृष्णेश्वर, भीमाशंकर, देहू या तीर्थक्षेत्रांचा होणार कायापालट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील सहा तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी ९९३.७२ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास आणि निधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या जतन व संवर्धनास शासनाचे प्राधान्य असून, तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच, भाविक-पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधासह आरोग्यसुविधाची उपलब्धता करण्याचे निर्देश फडणवीस यांनी यावेळी दिले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आ. सुनील शेळके, मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी केले सादरीकरण
पुण्याचे जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर आदर्श गाव विकास आराखडा व संत तुकाराम महाराज जन्मस्थान संवर्धन विकास आराखड्याचे सादरीकरण केले.
बीडचे जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन यांनी श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखडा व श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परिसर विकास आराखड्याचे सादरीकरण केले.
किल्ले अजिंक्यतारा जतन आणि संवर्धन व संगम माहुली (सातारा) समाधी स्थळ संवर्धन आराखडाचे सादरीकरण साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सादर केले.
श्री क्षेत्र भीमाशंकर येथे रोप वे रिसाॅर्टची उभारणी
श्री क्षेत्र भीमाशंकर येथील ग्रामस्थांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी १७३ कोटी रुपये. अत्याधुनिक बस स्थानक, रस्ते ७ मीटर रुंद , कव्हर्ड कॉरिडॉर, फ्लोअरिंग आणि एम्फीथिएटर, २५७ केएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, , केबल कार (रोपवे) सुविधा, एमटीडीसीच्या भीमाशंकर रिसॉर्टचा विकास करणार.
देहूच्या विकासासाठी ४१.७१ कोटी खर्च करणार
संत तुकाराम महाराज यांचे देहू येथील जन्मस्थान, वैकुंठगमन मंदिर परिसर, तसेच भंडारा डोंगर परिसराच्या विकासासाठी ४१.७१ कोटी रु. खर्च करणार. यामध्ये रस्त्यांचे सुशोभीकरण, स्वच्छता व्यवस्था, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, पार्किंग व्यवस्था, भाविकांसाठी निवास सुविधा, तसेच माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे.
किल्ले अजिंक्यतारा १३४.८० कोटी
सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले अजिंक्यताराचे जतन, संवर्धन आणि परिसर सुशोभीकरणासाठी १३४.८० कोटी रु. खर्च केले जातील. त्यात पायाभूत सुविधा, प्रेक्षक गॅलरी, नवे पादचारी मार्ग व लँडस्केपिंग, राज सदरेचे पुनरुज्जीवन, बुरूजांचे संवर्धन, पर्यटन आकर्षणे, अत्याधुनिक लटकता पूल, स्वच्छता व विश्रांतीगृहांची कामे.
संगम माहुली समाधीस्थळे विकासासाठी १३३ कोटी
संगम माहुली समाधीस्थळ संवर्धनासाठी १३३ कोटी रुपये खर्च केले जातील. त्यात महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळांचा जीर्णोद्धार आणि लँडस्केप विकास केला जाणार आहे. याशिवाय, ऐतिहासिक संगमेश्वर मंदिर व घाटाचे संवर्धन, नवीन झुलता पूल, प्रेक्षक गॅलरी उभारणार.
घृष्णेश्वर मंदिराच्या विकासासाठी २१० कोटी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ येथील प्रसिद्ध घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या विकासासाठी २१०.४५ कोटी रु.खर्च केले जातील. आधीच्या आराखड्यात ५३ कोटींची वाढ करण्यात आली. अत्याधुनिक भक्त निवास, प्रतीक्षागृह, शॉपिंग कॉम्प्लेक्स, सभागृह,, घाट आणि १.६ किमीचा बाह्य वळण रस्ता आदी कामे केली जातील.
परळी वैजनाथसाठी ३०१.५४ कोटी
‘श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर’ परिसर मूळ आराखड्यात नवीन कामांसाठी सुमारे ३०१.५४ कोटी रुपयांचा अतिरिक्त आराखडा मंजूर करण्यात आला. भव्य प्रवेशद्वारे, डिजिटल रांग व्यवस्था, प्रतीक्षागृहे, अन्नछत्र, योग-ध्यान केंद्र आणि मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण आदी विकास कामांचा समावेश आहे